अहमदनगर - गेल्या तीन दिवसांपासून आंदोलनांमुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एस. टी.) बस पाठविल्या नाहीत. त्यामुळे नगर विभागाला रोज ६० लाख या प्रमाणे सुमारे पावणेदोन कोटींचा तोटा झाला आहे. आज काही तालुक्यांतील ग्रामीण भागास बस सोडण्यात आल्या आहेत. उद्या त्यामध्ये वाढ करण्यात येणार आहे.
मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यात आंदोलन झाले. पोलिसांकडून झालेल्या लाठीमारामुळे आंदोलन चिघळले. तेथे अनेक एस.टी बस जाळण्यात आल्या. त्याचे पडसाद राज्यभर उमटले. नगर जिल्ह्यातही अनेक ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. एस. टी. बस बंद असल्याने खासगी वाहतुकदारांनी प्रवाशांकडून जादा दर आकारले.
या काळात प्रवाशांचे हाल झाले. काल बसस्थानकांना पोलिस बंदोबस्त देण्यात आला होता. तसेच बसस्थानक परिसरात फिरते पथक नेमण्यात आले होते. स्वस्तिक चौकात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या खासगी वाहनांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.
आज श्रावणी सोमवार असल्याने काही गावांमध्ये यात्रोत्सव होता. तेथे भाविकांना प्रवास करणे अवघड झाले. ग्रामीण भागातील मुलींना एस. टी. बसमधून मोफत प्रवास दिला जातो. अनेक दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना बसचा मोठा आधार असतो. आज बहुतेक विद्यार्थ्यांना शाळेत जाता आले नाही.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोटारसायकलवर येण्याचा प्रयत्न केला. अनेक विद्यार्थ्यांना मात्र महाविद्यालयाला दांडी मारावी लागली. गेल्या तीन दिवसांपासून एस.टी. बस बंद असल्याने महामंडळाचा तोटा होत आहे.
आंदोलनात बस जाळण्याची भीती असल्याने गाड्या न पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आज मात्र आंदोलनाची तीव्रता कमी होताना दिसताच काही गाड्या सोडल्या आहेत.
एस. टी. बस ही ग्रामीण भागाचा मोठा आधार आहे. ती सर्वांची आहे. त्यामुळे बसचे नुकसान करू नये. गेल्या तीन दिवसांत अहमदनगर विभागाला मोठा तोटा झाला आहे. आता टप्प्याटप्प्याने बस सोडण्यास प्रारंभ केला आहे.
मनीषा सपकाळ, विभागनियंत्रक, अहमदनगर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.