सर्व जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत विद्यार्थ्यांना अध्यापन केले. ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षणाची सुविधा नाही, अशांच्या घरी भेटी देऊन त्यांना अध्यापनाचे धडे दिले.
अहमदनगर : कोरोनाच्या (Corona) प्रादुर्भावाचा सर्वच क्षेत्रांवर परिणाम झाला असला तरी जिल्हा परिषदेच्या शाळांच्या (Zilla parishad schools) गुणवत्तेवर फारसा परिणाम झालेला नाही. कोरोना काळात शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत गुणवत्ता टिकवून ठेवली आहे. (zilla parishad schools have maintained quality online)
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या पहिले ते आठवीच्या तीन हजार ५७३ शाळा असून, दोन लाख २४ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामध्ये सहावी ते आठवीपर्यंतच्या ५४५ शाळा असून, तीन हजार २८ शाळा या पहिले ते पाचवीपर्यंतच्या आहेत. कोरोना प्रादुर्भाव असल्यामुळे मागील वर्षी शाळा उघडण्यास उशीर झालेला होता. त्यामध्ये पहिले ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरू झालेले नव्हते. कोरोनात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी राज्य शासनाने ऑनलाईन शाळा सुरु करण्याचा निर्णय मागील वर्षी घेतला होता. त्यानुसार सर्व जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत विद्यार्थ्यांना अध्यापन केले. ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षणाची सुविधा नाही, अशांच्या घरी भेटी देऊन त्यांना अध्यापनाचे धडे दिले.
हे करत असताना जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिका उपलब्ध करून दिल्या. यासाठी ग्रामपंचायतींची मदत घेण्यात आली. त्या माध्यमातून शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा अभ्यास करून घेतला. तसेच यू-ट्यूब, व्हिडिओ, झूम ॲप, व्हॉट्स ॲप ग्रुप आदींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अध्यापनाचे काम शिक्षकांनी केले. त्याच माध्यमातून विद्यार्थ्यांच्या परीक्षाही घेण्यात आलेल्या आहेत. दैनंदिन अध्यापनाबरोबरच पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी तयारी करून घेण्यात आली. जिल्हास्तरावरून प्रश्न पेढ्या तयार करून पाचवी व आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या.
जिल्हा परिषदेचा पट वाढला
खासगी शाळांच्या स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या शाळांनी भरारी घेतलेली आहे. मागील वर्षात पट हा चांगलाच वाढलेला आहे. शिक्षकांसह शिक्षण विभाग व शिक्षण समितीकडून राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचा हा चांगला परिणाम दिसून येत आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावात शिक्षकांनी वेगवेगळे उपक्रम राबविले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना अध्यापनाचे काम केले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता टिकून राहण्यास मदत झालेली आहे.
- शिवाजी शिंदे, प्रभारी शिक्षणाधिकारी.
खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषदेच्या शाळांचा गुणवत्तेचा आलेखाबरोबरच पट वाढत आहे. गुणवत्तेबरोबरच शाळांचा पट वाढविण्यासाठी शिक्षकांनी पालकांच्या संपर्कात राहून प्रयत्न करणे गरजेचे आहे. शाळांचा पट वाढल्यानंतर शिक्षकांची संख्याही वाढणार आहे.
- राजेश परजणे, सदस्य, शिक्षण समिती, जिल्हा परिषद.
(zilla parishad schools have maintained quality online)
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.