अकोला : जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीने शेती पिकांचे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या प्रचलित दरानुसार यापूर्वीच मदत दिली आहे. परंतु त्यामध्ये वाढ करण्यात आल्याचा शासन निर्णय राज्य शासनाने २१ ऑक्टोबर २०२१ रोजी जारी केला. परंतु अद्याप संबंधित मदत राज्य शासनाकडून जिल्हा प्रशासनाला मिळाली नसल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ३८ कोटी ८१ लाख ४५ हजार १५२ रुपयांची मदत शासनाच्या तिजोरितच जमा आहे. सदर निधीची मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे केली आहे.
गत वर्षी जिल्ह्यात पावसाला उशीराने सुरुवात झाली. परंतु त्यानंतर मात्र पावसाने रौद्र रूप दाखवले. २१ जुलै जुलैच्या रात्री ७ वाजतापासून जिल्ह्यात एकसारखा पाऊस कोसळला. पावसाचा जोर रात्री २ वाजेपर्यंत कायम राहिल्याने नदी-नाल्यांना पूर आला. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २६ महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. त्यामुळे सखल भागात आणि नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले. नदी व नाल्यांना पूर आल्याने गावे बाधित झाली. अतिवृष्टीमुळे काही शेतात पाणी साचले तर काही भागातील शेतीच खरडून गेली. त्यामुळे प्रशासनामार्फत प्रत्येक गाव स्तरावर ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहाय्यकामार्फत संयुक्त सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील १ लाख ३१ हजार ४९४.९४ हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना ३३ टक्के नुकसानीच्या मर्यादेनुसार ११५ कोटी ३५ लाख ३४ हजार २१६ रुपयांचा फटका बसला. त्यापैकी ९ हजार ३८ हेक्टरवरील शेतजमिन खरडून गेल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना शासनाने मदत निधी उपलब्ध करुन दिला होता. त्यानंतर उर्वरित १ लाख २२ हजार ४५६.८७ हेक्टरच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने ८४ कोटी २६ लाख रुपये मंजुर सुद्धा केले. त्यामुळे १ लाख ८० हजार ३३ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला व बहुतांश शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात रक्कम जमा सुद्धा झाली. दरम्यान २१ ऑक्टोबर २०२१ रोजी राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने शासन निर्णय जारी करुन शेतकऱ्यांना वाढीव दराने निधी देण्याचे जाहीर केले आहे. परंतु अद्याप शेतकऱ्यांना वाढीव मदत मिळाली नसल्याचे वास्तव आहे.
अशी मिळणार मदत
जिरायती पिकांच्या नुकसानीसाठी वाढीव दराने प्रती हेक्टर, दोन हेक्टरच्या मर्यादेत १० हजार रुपये मिळतील. यासंबंधीचा एसडीआरफचा प्रचलित दर ६ हजार ८०० रुपये प्रति हेक्टर, दोन हेक्टरच्या मर्यादेत आहे.
बागायती पिकांच्या नुकसानीसाठी वाढीव दराने प्रती हेक्टर १५ हजार रुपये, दोन हेक्टरच्या मर्यादेत मिळणार आहे. एसडीआरफचा प्रचलित दर १३ हजार ५०० रुपये प्रति हेक्टर, दोन हेक्टरच्या मर्यादेत आहे.
बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी वाढीव दराने प्रती हेक्टर २५ हजार रुपये, दोन हेक्टरच्या मर्यादेत मिळतील. या संबंधीचा एसडीआरफचा प्रचलित दर १८ हजार रुपये आहे.
शासनाकडे करण्यात आलेली निधीची मागणी
तालुका देय फरकाची रक्कम
अकोला -१ कोटी ७६ लाख ५३ हजार १२०
तेल्हारा - ६५ लाख ७० हजार ३३६
बाळापूर - ६ कोटी ८४ लाख ७५ हजार १३६
पातूर - ६ कोटी ६९ लाख २ हजार ७२०
अकोला - १५ कोटी २७ लाख ६४ हजार ८००
बार्शीटाकळी - ७ कोटी ३७ लाख ६३ हजार ८४०
मूर्तिजापूर - २० लाख १५ हजार २००
एकूण - ३८ कोटी ८१ लाख ४५ हजार १५२
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.