पुढच्या वर्षी पीक बदलतो गड्या...गेल्यावर्षी सोयाबीनची माती झाली अन् यंदाही होणार

Soybean crop.jpeg
Soybean crop.jpeg

अकोला : किती बी नुकसान झालं तरी दरवर्षी आपण सोयाबीनच पेरतो. पण प्रत्येकवेळी अतिवृष्टी, दुष्काळ, अवकाळी पाऊस अन् भाव पडल्यानं सोयाबीन हंगाम तोट्‍यातच चालला गड्या वर्षी अतिवृष्टी, अवकाळी पावसानं मूग, उडीद अन् सोयाबीन उद्‍ध्वस्त केलं. यंदा बी पाऊस थांबाचं नावच घेत नसून झाडावरच्या हिरव्या शेंगालेच कोंब फुटले आहेत. अजून किती वर्ष नुकसान सोसायचं...त्यापेक्षा पुढच्या वर्षीपासून पिकच बदलतो गड्या...असा शेतकरी संवाद सध्या जिल्ह्यातील गावागावांमध्ये ऐकायला मिळत आहे.

तीन ते चार वर्षांपासून पावसाचा लहरीपणा, अतिवृष्टी, दुष्काळ, किडींचा प्रादुर्भाव व याला कारण म्हणजे ऋतुचक्रातील बदल, यामुळे खरिपासह रब्बी हंगामही नुकसानात जात आहे. उन्हाळी हंगाम तर लुप्त होण्याच्याच मार्गावर आहे. उरली सुरली कसर पडलेले बाजारभाव काढतात. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. यंदाही बियाणे निकृष्ट व बोगस निघाल्याने, सोयाबीन उत्पादकांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. त्यानंतर जोरदार पाऊस झाला परंतु, तो आता थांबायलाच तयार नाही. आतातर पाऊस जास्त झाल्याने उभ्या पिकात सोयाबनच्या शेंगांना कोंब फुटु लागले आहेत. त्यामुळे यावर्षी देखील खरीप हंगाम नुकसानातच जाण्याची शक्यता बळावली आहे.

पावसाची धास्ती!
सततच्या व अधिक पावसामुळे जिल्ह्यात बहुतांश भागात सोयाबीनच्या उभ्या पिकात हिरव्या शेंगांना कोंब फुंटले असून, पावसाने आता विश्रांती घेतली नाही तर, अख्खा सोयाबीन हंगाम धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांनी आता पावसाचीच धास्ती घेतली असून, आता तरी पाऊस थांबला पाहिजे अशी प्रार्थना जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक करीत आहेत.

पुढच्या आठवड्यात मॉन्सूनचा परतीचा प्रवास
आर्द्रता ७५ टक्क्यांपेक्षा अधिक असल्यास पावसाचे वातावरण निर्मिती होते. सध्या अकोल्यासह संपूर्ण विदर्भात सरासरी आर्द्रतेचा टक्का वाढला आहे. त्यामुळे वातावरणानुसार दोन ते तीन दिवस या परिसरात २४ सप्टेंबरच्या दुपारपासून जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मॉन्सूनचा परतीचा प्रवास ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल. या प्रवासातही जोरदार पावसाची हजेरी लागू शकते.
- संजय अप्तुरकर, हवामान तज्ज्ञ, नागपूर

तत्काळ पंचनामे करून मदत द्यावी
जिल्ह्यात पावसाचा कहर सुरूच असून, त्यामुळे सोयाबीन, कपाशी व इतरही पिकांचे अस्तित्व धोक्यात आलं आहे. मूग तर काढायच कामच पडलं नाही. अनेकांची शेती खरडून गेली, अनेकांचे पीक किडीच्या प्रादुर्भावामुळे उद्ध्वस्त झाले. त्यामुळे राज्य व केंद्र सरकारने तत्काळ सर्वे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी जागर मंचचे कृष्णा अंधारे, मनोज तायडे, जगदिश मुरमकर, राजु मंगळे, ज्ञानेश्वर सुलताने, दिलीप मोहोड, ज्ञानेश्वर गावंडे, विजय देशमुख, महादेव दुतोंडे, राजु भाकरे, शिवा टेके, दीपक गावंडे, राजु गवई, गजानन वारकरी, सुनील गोंडचवर, संजय भाकरे, आदींनी शासनाकडे केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com