‘कृषी’चे पंचनामे फेल, शेतकऱ्यांचे निघाले तेल!

`shetkari (2).jpg
`shetkari (2).jpg

अकोला : खरीप २०२०-२१ करीता महाबीजने दिलेले बियाणे बोगस असल्याचे किंवा निकृष्ट असल्याच्या जिल्ह्यातून प्राप्त हजारो तक्रारांपैकी ३३६१ तक्रारींवरून कृषी विभागाद्वारे पाहाणी करण्यात आली. मात्र, त्यांचेपैकी केवळ ३३५ तक्रारीच सदोष असल्याचा शेरा देत, कृषी विभागाने तसा अहवाल महाबीजकडे सुपूर्द केला आहे.



दरवर्षी दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गरापिट, पावसाचा लहरीपणा आणि कीड, रोगांच्या प्रादुर्भावात शेतकऱ्याचे मोठे नुकसान होते. मात्र यावर्षी अनेक नामवंत बियाणे कंपन्यांचे बियाणे पेरून उगवलेच नसल्याने ते बोगस असल्याच्या किंवा निकृष्ट असल्याच्या हजारो तत्कारी जिल्ह्यातून तर, लाखो तक्रारी राज्यभरातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे केल्या आहेत. विशेष म्हणजे अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या हीताची, विश्‍वासाची व शेतकऱ्यांच्या सहभागातूनच उभारण्यात आलेली महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ या संस्थेचे सोयाबीन बियाणे सुद्धा निकृष्ट निघाल्याच्या किंवा बोगस तसेच उगवलेच नसल्याच्या तक्रारी राज्यभरातून शेतकऱ्यांनी केल्या. त्याबाबत ‘सकाळ’ने सातत्याने पाठपुरावा करीत, संबंधित तक्रारींवर चौकशी होण्याबाबत, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तसेच बियाणे बदलून देण्याबाबतची मागणी वृत्त प्रकाशित करून मांडली. त्यानंतर कृषी विभागाला तत्काळ चौकशीचे निर्देशही वरिष्ठ स्तरावरून देण्यात आले. मात्र कृषी विभागाने संबंधित तक्रारींच्या अनुषंगाने पाहणी करत अकोला जिल्ह्यातील ३३६१ तक्रारींपैकी केवळ ३३५ तक्रारी सदोष असल्याचा अहवाल महाबीजकडे सुपूर्द केला आहे. त्यानुसार महाबीजनेही केवळ ३३५ तक्रारीवर विचार करीत बियाण्याचे पैसे किंवा बियाण बदलून देण्याचा घाट मांडला. हे करीत असताना महाबीजनेही स्वतःचे निकषाची चाळणी लावून केवळ ३५ शेतकऱ्यांना बियाणे नुकसान मोबदला अदा केला आहे.

३०२६ शेतकऱ्यांना ठरवले खोटारडे!
महाबीजचे बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे ते निकृष्ट किंवा बोगस असल्याच्या अकोला जिल्ह्यातून ३३६१ तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या. मात्र कृषी विभागाने त्यांच्या विशिष्ट निकषाची चाळणी लावून केवळ ३३५ शेतकऱ्यांच्या तक्रारी सदोष असल्याचे आणि ३०२६ शेतकऱ्यांच्या तक्रारी चुकीच्या ठरविल्या आहेत.

अधिकाऱ्यांना फोनची घंटी ऐकू येईना
अकोला जिल्ह्याच्या कृषी अधीक्षकांची बदली झाली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या कृषी उपसंचालकांना तसेच जिल्हा परिषद कृषी विकास अधिकाऱ्यांनाही फोन करून संबंधित विषयाची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, ते फोनच उचलायला तयार नाहीत. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या तक्रारी नापास कशा झाल्या, याचा खुलासाच होऊ शकला नाही.

शेतकऱ्यांना सेवा देण्यासाठी, त्यांचे हीत जोपासण्यासाठी ‘कृषी विभाग, महाबीज, आत्मा’ची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु, दृष्टीसमोर असलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानाच्या तक्रारी खोट्या ठरवून कृषी विभाग, महाबीजच्या अधिकाऱ्यांनी शेतकरी हिताऐवजी स्व हीत जोपासल्याचे व स्वतःची निष्क्रियता लपविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची व त्यांच्या कार्याची, निकषांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी.
- कृष्णा अंधारे, संयोजक, शेतकरी जागर मंच, अकोला

कृषी विभागाने सदोष ठरविलेल्यांपेक्षा अधिक तक्रारी केवळ कौलखेड व लगतच्या गावातून शेतकऱ्यांनी केल्या आहेत. असे असताना केवळ ३३५ शेतकऱ्यांच्याच तक्रारी सदोष कशा? ते नापास ठरविण्याचे निकष काय? तक्रारी सदोष नसतील तर, हजारो शेतकऱ्यांनी दुबार, तिबार पेरणी का केली? इत्यादी प्रश्‍नांची उत्तरे कृषी विभागाने द्यावीत.
- मनोज तायडे, संयोजक, शेतकरी जागर मंच, अकोला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com