टाकळी ढोकेश्वर : शेतीवरील संकटांची नेहमीच चर्चा होते. दुष्काळ, मग तो ओला असो व सुका; त्याचा परिणाम ठरलेलाच. त्यात बाजारभावासह अन्य बाबी ठरवलेल्या. मात्र, या सर्वांवर मात करत दैठणे गुंजाळ (ता. पारनेर) येथील गुंजाळ कुटुंबाने पेरूच्या शेतीतून आठ महिन्यांत चाळीस लाख रुपये कमावले.
बाळासाहेब गुंजाळ यांनी दहा एकरांवर वर्षभरापूर्वी तैवान वाणाच्या पेरूच्या साडेआठ हजार रोपांची लागवड केली. त्यासाठी त्यांना आठ लाख रुपयांपर्यंत खर्च आला. या पेरूला बाजारात मोठी मागणी आहे. 400 ते 900 ग्रॅम वजनाचा हा पेरू अतिशय मऊ आणि कमी गोड असल्यामुळे मागणी जास्त आहे.
जास्त कष्ट नाही
टिकण्याची क्षमता जास्त असल्यामुळे त्याला लांबच्या बाजारपेठेत पाठवता येते. त्यामुळे उत्पन्नात घट होत नाही. पेरूबागेसाठी जास्त कष्ट घ्यावे लागत नाहीत. गुंजाळ यांनी बागेला कोंबडीखत आणि शेणखत घातले. पाच कोटी लिटर क्षमतेचे शेततळे आहे. त्यातून रोज अर्धा तास ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिले.
रासायनिक खताची गरज नाही
या पेरूसाठी रासायनिक खतांची गरज नाही, अशी माहिती त्यांनी दिली. लागवडीनंतर अवघ्या आठ महिन्यांतच उत्पादन सुरू झाले. चार महिन्यांत 40 लाखांचे पेरू विकले आहेत. आणखी चार महिन्यात साधारण वीस लाखांचे पेरू विकले जातील, असे गुंजाळ यांनी सांगितले.
कमी खर्चात जास्त उत्पन्न पेरूच्या बागेतून मिळाले. महागाची खते, औषधे न वापरता शेणखताचा वापर केला. शेततळ्याद्वारे ठिबक सिंचनाचा वापर केला. शेतकऱ्यांनी आता अन्य पिकांचा विचार करावा. त्यातून अधिक उत्पन्न मिळविता येते.
- बाळासाहेब गुंजाळ, शेतकरीदुष्काळ, बाजारभाव यांसह इतर अडचणी शेतकऱ्यांसमोर कायमच आहेत. मात्र, यावर मात करत गुंजाळ कुटुंबाने आदर्श घालून दिला आहे. आधुनिक शेतीचा योग्य वापर त्यांनी केला. शेतीमध्ये वेगळा पर्याय निवडून त्यात चांगले यश मिळविले आहे.
- बंटी गुंजाळ, सरपंचसंपादन - अशोक निंबाळकर
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.