श्रीगोंदे : दोन जिल्हे व तीन तालुक्यातील शेतीला वरदान ठरणारे घोड धरण आज "ओव्हर-फ्लो' झाले. धरणात सध्या 86 टक्के उपयुक्त पाणीसाठा असला, तरी नव्या पाण्याची आवक पाहता, धरणातून दोन्ही कालवे व नदीत विसर्ग सुरू करुन जलसंपदा विभागाने धरण "ओव्हर-फ्लो' झाल्याचा संदेश लाभधारकांना दिला.
दरम्यान, धरणावर जाऊन माजी आमदार राहुल जगताप यांच्यासह कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जलपूजनही केले. पुणे जिल्ह्यातील शिरुर व नगर जिल्ह्यातील श्रीगोंदे व कर्जत तालुक्यातील मोठी शेती घोड धरणाच्या लाभक्षेत्रात आहे.
गेली 55 ते 60 वर्षांपासून घोडच्या पाण्यावर या भागातील शेती फुलते आहे. घोडच्या पाण्यात घोडगंगा, नागवडे, साईकृपा (हिरडगाव), अंबालिका (राशीन) हे कार्यक्षेत्र येते. या कारखान्यांसह घोडच्या पाण्यावर परिसरातील सात ते आठ कारखाने अवलंबून असतात. घोडमुळे या भागातील उसाचे क्षेत्र कमालीचे वाढले आहे.
हेही वाचा - फक्त माझ्यावरच गुन्हा दाखल करू नका
धरणातून काल रात्री डावा व उजवा कालवा सुरू करण्यात आला. मात्र, आज सकाळी पाणलोट क्षेत्रातील पाण्याची आवक चांगली राहिल्याने घोड नदीलाही पाणी सोडण्यात आले. नदीला पाणी सोडल्याने धरण "ओव्हर-फ्लो' झाल्याचा संदेश मिळाला.
एरवी परतीच्या पावसापर्यंत धरण भरण्याची वाट पाहावी लागते. यंदा मात्र धरण लवकरच भरल्याने लाभक्षेत्रात समाधान व्यक्त झाले. जगताप, घनश्याम शेलार, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक भोसले, मनोहर पोटे यांच्यासह कार्यकर्त्यांनी जलपूजन केले.
दरम्यान, "घोड'च्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर कमी झाल्यास नदीला सोडलेल्या पाण्याबाबत विचार करावा लागेल.
संपादन - अशोक निंबाळकर
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.