सोनई (अहमदनगर): मुळा सहकारी साखर कारखाना उसाची नोंद घेत नाही व तोड देत नसल्याने हनुमानवाडी येथील युवा शेतक-यांने शासन व संबंधित मंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यासह दीड एकर उसाचे पीक पेटवून दिला आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा राजकारण पेटले आहे.
मुळा कारखाना उसाची नोंद घेत नाही व तोडही देत नसल्याने हनुमानवाडी येथील ॠषीकेश वसंत शेटे यांनी गट नंबर ५६६ मधील दीड एकर उसाचे पीक पेटवून दिले.महाविकास आघाडी सरकार व संबंधित मंत्र्यांचे प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी परीसरातील शेतकरी,पोलिस बंदोबस्त व बघ्यांची गर्दी जमा झाली होती.
मागील महिन्यात करजगाव येथे अशोक टेमक यांनी अडीच एकर उसपीक पेटवून दिले होते. त्यानंतर सोशल मीडियावर स्टंटबाजीचा कलगीतुरा रंगला होता. दडपण आणून उसतोड करण्याचा हा प्रयत्न असून शेतकी विभाग त्यास बळी पडला तर आम्हीही उस पेटवून देवू, असे खरवंडी, चांदे व सोनई गटातील शेतक-यांनी सांगितले.
मुळा कारखाना करीत असलेल्या अन्यायाचा निषेध म्हणून महाविकास आघाडी सरकार व मंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन करीत उसाचे पीक पेटवून दिले. साखर आयुक्तांपुढे कैफियत मांडून उपयोग झाला नाही. पुढील आंदोलन आत्मदहनाचे असणार आहे, असे ॠषीकेश शेटे यांनी सांगितले.
काही राजकीय विरोधक फक्त बदनामी करण्यासाठी स्टंटबाजी करत आहेत. नोंदी दिलेल्या शेतक-यांवर अन्याय नको म्हणून या दडपणाला घाबरणार नाही.
- नानासाहेब तुवर, अध्यक्ष मुळा कारखाना.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.