शिर्डी ः साईसंस्थानात मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अनुभवी सनदी अधिकारी नेमावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने चार वर्षांपूर्वीच दिला आहे. त्यासाठी आणखी आठ दिवसांचा वेळ राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात मागितला.
इकडे सध्याचे कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे हे बदली स्थगित करण्यासाठी "कॅट'मध्ये गेले. सामान्य प्रशासन विभागाने बगाटे यांची बदली झाल्याचे पुन्हा जाहीर केले. त्यांच्या जागी कोण, हा प्रश्न मात्र अनुत्तरीत ठेवला. त्यामुळे साईसंस्थानात "ऑल इज नॉट वेल' नसल्याचे दिसत आहे.
तदर्थ समितीकडे सध्या संस्थान व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. मात्र, मुख्य कार्यकारी अधिकारी बगाटे आणि समितीचे अध्यक्ष यांच्यातील पत्रव्यवहार पाहिला, तर तेथेही समाधानकारक स्थिती नाही. पूर्वीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी उच्च न्यायालय व तदर्थ समितीचे परवानगी न घेता, 598 कंत्राटी कर्मचाऱ्यांना संस्थान आस्थापनेवर कंत्राटी स्वरूपात घेतले, असा आक्षेप घेत तदर्थ समितीने याबाबत फेरप्रस्ताव पाठविण्याची सुचना केली. हे कर्मचारी पुन्हा कंत्राटदाराकडे वर्ग झाले. न्यायालयीन लढाई सुरू झाली. त्यानंतर आलेले मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी साईमंदिर व दानपेटीतील उत्पन्न बंद आणि खर्च सुरू असताना, 15 कोटी रुपये किंमतीची जमीनखरेदी केली. त्यासाठी तदर्थ समिती व उच्च न्यायालयाची परवानगी घेतली नाही, असा आक्षेप समितीच्या अध्यक्षांनी घेतला.
खरे तर येथे सनदी अधिकारी नियुक्त करण्यामागे साईसंस्थानच्या विकासास चालना मिळावी. कारभार भाविकामूख व्हावा, अशी अपेक्षा आहे. त्याऐवजी कायद्याचा किस पाडला जात आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी बगाटे यांनी तर माध्यमांच्या प्रतिनिधींना मंदिर परिसरात येऊ द्यायचे की नाही, यासाठी विनाकारण वाद ओढवून घेतला. त्यासाठी दोन दिवस खर्ची घातले.
वास्तविक हे काम जनसंपर्क विभागाचे. मात्र, सर्व निर्णय मीच घेणार, या कार्यपद्धतीमुळे त्यांना मोठ्या नाराजीला तोंड देण्याची वेळ आली. खासदार सदाशिव लोखंडे, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. एकनाथ गोंदकर व काही ग्रामस्थ दुखावले गेले. हे असेच सुरू राहिले, तर नाराजांच्या संख्येत दिवसागणिक भर पडत जाईल.
ग्रामस्थ व राजकीय नेत्यांची साईदर्शनासाठी अडवणूक करायची.
साईसंस्थानची प्रसिद्धी करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींना बंधने घालण्यात वेळ खर्च करायचा. या मुळे बगाटे वादग्रस्त ठरले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दूरदृष्टी ठेवून निवृत्त सनदी अधिकारी व राज्याचे मुख्य सचिव द. म. सुकथनकर यांना अध्यक्षपद दिले. त्यांनी या पदाची उंची वाढवून विकास साधला. हे या नव्या अधिकाऱ्यांना कुणी सांगायचे?
माजी मंत्री शंकरराव कोल्हे, आमदार राधाकृष्ण विखे पाटील, दिवंगत माजी आमदार जयंत ससाणे यांनी येथे विकासकामे करून दाखविली. आता विकास राहिला बाजूला, आणि साई मंदिरात कुणाला आणि कुणाच्या आदेशाने प्रवेश द्यायचा, असा वाद निर्माण करण्यात धन्यता मानली जाते. हे खरे तर साईसंस्थानचे दुर्दैव म्हणावे लागेल.
संपादन - अशोक निंबाळकर
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.