अकोले (अहमदनगर) : अकोले तालुक्याची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल (आसवनी) प्रकल्पाला उत्पादन घेण्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे या गळीत हंगामापासून इथेनॉल उत्पन्न घेणे शक्य असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष माजी मंत्री मधुकरराव पिचड व कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम गायकर यांनी दिली.
कारखान्याच्या रौप्य महोत्सवीवर्षानिमित्त कारखान्याने इथेनॉल प्रकल्प हाती घेतला होता. त्याची बांधणी पूर्ण झाली. उत्पादन घेण्यास इथेनॉल प्रकल्प सज्ज झाला आहे, अशी माहिती यावेळेस त्यांनी दिली. अगस्ती सहकारी साखर कारखाना स्थापना होऊन २५ वर्षे झाली आहेत.
स्पर्धेच्या काळामध्ये शेजारील कारखान्यांच्या भावाशी स्पर्धा कायम ठेवत कारखान्याने ऊस उत्पादकांचे हित सतत साधले आहे. त्यातून या कारखान्याच्याबरोबर कारखाने उभे राहिले होते. ते जवळपास आजारी किंवा बंद स्थितीत आहेत. मात्र अगस्ती सहकारी साखर कारखाना आता वेगाने घोडदौड करत असून इथेनॉल उत्पादन घेतल्यानंतर शेतकऱ्यांच्या पदरामध्ये अधिकचा भाव टाकता येईल. संचालक मंडळाने घेतलेला निर्णय फायदेशीर ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पर्यावरण विभागाने 'ना हरकत दाखला' दिल्यावर आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने उत्पादन घेण्याच्या दृष्टीने हिरवा कंदील दाखवला. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये गळीत हंगाम सुरू होत असून या गळीत हंगामात हा प्रकल्प लागलीच उत्पादन घेण्यास सुरुवात करील असा दृढ विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विशेषबाब म्हणजे इथेनॉलला चांगल्या प्रकारची मागणी सध्या तरी टिकून आहे. को-जनरेशनच्या प्रकल्पांना तशा अर्थाने कोणत्याही प्रकारचा सध्या तरी वाव दिसत नाही आणि म्हणून या कामी दूरदृष्टी आम्ही दाखवली. त्याचा आम्हाला निश्चितपणे आनंद वाटतो. याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
हा प्रकल्प उभा करण्यासाठी जेष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे- पाटील, त्याचबरोबर साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, संचालक विकास देशमुख यांनी वेळोवेळी या प्रकल्पासाठी बहुमोल मार्गदर्शन केले.
ऊस उत्पादकांच्या दृष्टीने इथेनॉल प्रकल्प सुरू करणे ही आनंदाची बातमी आहे. एक्ससाईजचा परवाना मिळाला. त्यामुळे साखर उत्पादनाचाही निश्चितपणे फायदा होईल. साखर उत्पादकांना उसाला भाव वाढवून देण्यास शक्य होणार आहे. इथेनॉल निर्मिती व केंद्राच्या धोरणामुळे इथेनॉलला चांगला भाव भेटेल आणि कारखाना उर्जितावस्थेत आणण्यासाठी हा प्रकल्प संजीवनी ठरेल, असे गायकर यांनी सांगितले.
कार्यकारी संचालक भास्करराव घुले म्हणाले, प्रत्यक्ष उत्पादन घेण्याच्या दृष्टीने जो परवाना हवा होता तो मिळाल्याने नजिकच्या काळामध्ये कारखाना सुरू झाल्याबरोबर मोलासिसची निर्मिती होऊन कारखान्याला उत्पादनाबरोबरच विक्रीलाही परवाना भेटल्याने सर्व कारखाना आता चैतन्यात न्हाऊन निघत आहे.
संपादन : अशोक मुरुमकर
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.