अकोला : दरवर्षी दहावीचा निकाल हा साधारण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो. परंतू, यंदा कोरोनामुळे सर्वच निकालांना उशीर झाला आहे. मागील तीन महिन्यांपासून विद्यार्थी आणि पालकांचे संपुर्ण लक्ष दहावीच्या निकालाकडे लागले होते. अखेर बोर्डाने बुधवारी दहावीचा निकाल जाहीर केला.
राज्य शिक्षण मंडळाद्वारे अमरावती विभागाअंतर्गत मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक इयत्ता दहावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल बुधवार, २९ जुलै रोजी ऑनलाईन जाहीर करण्यात आला असून, दरवर्षीप्रमाणे यंदादेखील मुलींनीच बाजी मारली आहे.
अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा
कोरोना संकटाच्या पृष्ठभूमीवर जाहीर झालेल्या या निकालात अकोला जिल्ह्याचा निकाल ९५.५२ .टक्के लागला आहे. बारावीप्रमाणे दहावीच्या निकालातदेखील मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ९७.२३ टक्के, तर मुलांचा निकाल ९३.९९ टक्के लागला आहे.
अमरावती विभागातील निकालात जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. मार्चमध्ये झालेल्या दहावी परीक्षेसाठी जिल्ह्यात ११९ परीक्षा केंद्रं होती.
जिल्ह्यात एकूण २७०९१ नोंदणीकृत परीक्षार्थी होते. त्यापैकी २६९३३ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस बसले होते. त्यापैकी ८९३८ विद्यार्थी विशेष गुणवत्ता श्रेणीत, ९०९९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ६२४५ द्वितीय श्रेणीत, तर १५५४ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत असे एकूण २५७२७ विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण करण्यात यशस्वी झाले आहेत.
जिल्ह्यात बारावीच्या निकालातही मुलीच अव्वल ठरल्या होत्या. दहावीच्या निकालाने विद्यार्थ्यांच्या स्वप्नांच्या पंखांना नवे बळ मिळाले आहे.
पातूर तालुका अव्वल
जिल्ह्यात पातूर तालुक्याचा निकाल सर्वाधिक ९७.१७ टक्के लागला आहे. त्यानंतर मुर्तीजापूर - ९६.८५ टक्के, बार्शीटाकळी - ९६.१३ टक्के, अकोला ९५.६८ टक्के, अकोट - ९४.८६ टक्के, बाळापूर - ९४.६८ टक्के व तेल्हारा ९३.६५ टक्के असा क्रम आहे.
भूगोलच्या पेपरमुळे निकालावर परिणाम
यावर्षी दहावीची लेखी परीक्षा ३ मार्च ते २३ मार्च या काळात घेण्यात आली होती. यामध्ये शेवटचा पेपर भुगोलाचा होता, पण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हा पेपर रद्द केला होता. २४ मार्चपासून सुरु झालेल्या लॉकडाऊनमुळे उत्तरपत्रिका पोस्टामध्येच अडकून पडल्या होत्या. लॉकडाऊनमुळे उत्तरपत्रिका तपासणी आणि त्यांचं विभागीय मंडळातील संकलन हे एक मोठं आव्हान मंडळापुढे होतं.
त्यातच भुगोल विषयांचं गुणदान कसं करायचं हा एक मोठा प्रश्न मंडळापुढे होता. या विषयाबाबत मंडळाने निर्णय घेत बाकीच्या विषयांमध्ये मिळालेल्या गुणांची सरासरी काढून त्याचं रुपांतर हे रद्द झालेल्या भुगोल पेपरच्या गुणांमध्ये करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. यामुळे दहावीच्या गुणदानाचा तिढा सुटला.
उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन
विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी ३० जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत तर छायांकितप्रतीसाठी ३० जुलै ते १८ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत अनिवार्य असून ही प्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत विहित शुल्क भरुन विभागीय मंडळाकडे ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
(संपादन - विवेक मेतकर)
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.