नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने 'एटीएम'मधून पैसे काढण्याच्या नियमात बदल केला आहे. एसबीआयच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी आता 'वन टाइम पासवर्ड' (ओटीपी) टाकणे बंधनकारक करण्यात येणार आहे.
नवीन वर्षात 1 जानेवारीपासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. देशभरातील सर्व एटीएममध्ये ही सुविधा लागू होणार आहे. एटीएम केंद्रांवर होणाऱ्या गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलले असल्याचे बॅंकेने स्पष्ट केले आहे.
स्टेट बॅंकेच्या ग्राहकांना 10 हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी 'ओटीपी' टाकावा लागणार आहे. बॅंकेत ग्राहकाचा जो संपर्क क्रमांक नोंदणीकृत आहे, त्यावर ओटीपी पाठवला जाणार आहे. आणि या माध्यमातून पैसे काढता येतील. यामुळे खातेधारकाशिवाय इतर कोणालाही एटीएममधून पैसे काढता येणार नाही किंवा बॅंकेकडे नोंदणीकृत असलेल्या क्रमांकांवर 'ओटीपी' येणार असल्याने तो संपर्क क्रमांक सोबत असणे आवश्यक आहे.
महत्त्वाचे म्हणजे रात्री 8 ते सकाळी 8 च्या दरम्यान 10 हजारांपेक्षा जास्त रुपयांच्या व्यवहारांनाच ओटीपी लागू असणार आहे. तसेच दिवसभरात होणाऱ्या व्यवहारांसाठी तसेच 10 हजारांपेक्षा कमी रकमेसाठी 'ओटीपी' टाकण्याची आवश्यकता असणार नाही. तसेच एसबीआयचे खातेधारक जर दुसऱ्या बॅंकेच्या एटीएममधून पैसे काढत असतील तरी देखील ओटीपी विचारला जाणार नाही. कारण दुसऱ्या बॅंकांच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी आवश्यक असणाऱ्या 'नॅशनल फायनान्शिअल स्विच' प्रक्रियेत यासंदर्भातील बदल करण्यात आलेले नाहीत.
एसबीआयच्या 'एटीएम'मधून पैसे काढण्यासाठी प्रक्रिया :
ग्राहक जेव्हा पैसे काढत असेल तेव्हा 'एटीएम स्क्रीन'वर रक्कमेसह ओटीपी स्क्रीन दिसेल. ग्राहकाचा बॅंकेत जो नोंदणीकृत नंबर आहे, त्यावर ओटीपी येईल. नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेला 'ओटीपी' टाकल्यानंतरच व्यवहार पूर्ण होऊन पैसे मिळणार आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.