या जगात तुमची, माझी, सर्वांची एंट्री होते ती मुळात एखाद्या हॉस्पिटल किंवा नर्सिंग होममध्ये. जगात प्रवेश करताना आपण काहीच नसतो. आईच्या कुशीत पहुडलेलं छोटंसं बाळ. रडलं की सगळं काही मिळतं अशी ती स्थिती. त्या वयात व्यक्त होण्याची तीच एक रीत आपणाला विधात्याने शिकवलेली असते. काळ जसजसा पुढे सरकत जातो, तसतसे बदल होत जातात. नंतर एक नाव मिळते. पर्सनॅलिटी मिळते. नेणत्या अवस्थेतून जाणत्या अवस्थेपर्यंत पुढे होणारा आपला प्रवास खरेच कुणाला तरी माहीत असतो का... अनेक महान व्यक्तींनी आपल्या जगण्यातून आदर्श निर्माण केला आहे. सुखी जीवन जगण्याच्या निरनिराळ्या कल्पनाही अनेकांनी मांडल्या आहेत. पण प्रत्येकाला तसं होता येत नाही. कारण प्रत्येकाचं जगणं मूलतः वेगळं असतं. जीवनाचा हा प्रवास असाच सुरू असतो ज्याचा त्याचा... थेट अंतापर्यंत.
लहानपणाच्या त्या दिवसांपासून ते अगदी शेवटपर्यंत आपली सोबत कोणी करीत असेल तर त्या असतात आठवणी. आपला पाठलाग आठवणी कधीच सोडत नाहीत. आठवणींचं हे गाठोडं आपल्यासोबत असतं नेहमीच. त्याला स्मृती असंही म्हणता येईल. विचार करून पाहा... तुम्ही झोपला आहात अन् दुसऱ्या दिवशी तुम्ही सगळं काही विसरलात... आठवणींचं हे गाठोडं कुठेतरी हरवलं तर... काय पंचाईत होईल... तर अशाच एका हॉस्पिटलमधील वेटिंग लॉबीमध्ये एक वाळूचं घड्याळ पाहिलं होतं. सेकंद काट्याऐवजी या घड्याळात थोडीशी वाळू एका क्युबमधून दुसऱ्या क्युबमध्ये पडत होती. एक क्युब भरला की संपला एक मिनीट. असेच ते घड्याळ पुढे पुढे सरकत होते. वेटिंग लॉबीत थांबलेल्या आणि तिथून जाणाऱ्या प्रत्येकाचं लक्ष वेधून घेण्याची ताकद होती या निसटणाऱ्या वाळूच्या कणांमध्ये. अर्थात क्षणांमध्ये.
तुम्ही किती जगलात यापेक्षा कसं जगलात हे महत्त्वाचं, असं कुठंतरी वाचलं आहे. खरंय ते. काळाचा प्रत्येक क्षण येतो आणि जातो, आपलं जीवन कमी करत करत. जीवनातल्या काही क्षणांची, प्रसंगांची नोंद मनाच्या हार्ड डिस्कमध्ये होत असते. आई-दादांनी साजरा केलेला आपला वाढदिवस, शाळेतील दहावीच्या हॉलतिकिटावरचा फोटो, नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी टाय-कोट वगैरे घालून दिलेला फोटो आणि लग्नसोहळ्यातील नातेवाइकांचे आनंदी चेहरे दाखविणारे अल्बममधील फोटो कधी निवांत क्षणी पाहिले तर मन भूतकाळात ओढलं जातं. मग जाणवतं की, जीवनाच्या प्रवासात अनेक सोबत्यांनी आपली साथ सोडली, तर काही नवीन चेहरेही आपल्या वर्तुळात आले आहेत. आयुष्यातील काही घटनांनी आपण आनंदी होतो. काही प्रसंग व्यथित करणारेही असतात. त्यामुळे जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला हवा. त्याला फार काही लागत नाही. नात्यांमधील हेवेदावे, मैत्रीतील दुरावे, आपापसांतील रुसवेफुगवे तेवढ्यापुरते धरून नंतर सोडून दिले की सगळं काही ठीक होतं. आयुष्याच्या सांजवेळी मनात साठवलेले हे क्षण डोळ्यांसमोरून हलत असतात. दुसरं काय? शेवटी एवढंच सांगायचं की...
बडी लंबी जिंदगी के
यह कुछ हसीन लमहे
हाथोंसे कहीं छूट ना जाये
नर्म हालातोंकी इस गर्दीश में
कहीं हमारे अपने रूठ ना जाये
वक्तपर संभलिये जनाब
ख्वाबोंका ये आशियाना
कहीं टूट ना जाये...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.