नवी दिल्ली : चिनी नागरिकांचे पर्यटक व्हिसा रद्द करून भारताने चीनला जशास तसे प्रत्युत्तर दिल्यानंतर आता पुन्हा पर्यटक व्हिसा सुरू करण्यासाठी ही योग्य वेळ नसल्याचे भारताकडून बजावण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर पाकिस्तानचा आक्षेपही भारताने फेटाळला असून या दौऱ्यावर टिप्पणी करण्याचा पाकिस्तानला कोणताही अधिकार नाही, अशा शब्दांत भारताकडून फटकारण्यात आले.परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची(Arindam Bagchi) यांनी व्हिसा मुद्द्यावर चीनला सूचक शब्दांत लक्ष्य केले.
चीनमध्ये शिकणाऱ्या २२ हजार भारतीय विद्यार्थ्यांना कोरोना संसर्गाची परिस्थिती सुधारल्यानंतरही चीनने व्हिसा दिलेला नाही त्यामुळे हे विद्यार्थी चीनमध्ये जाऊ शकत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या निर्णयाचा चीनने फेरविचार करावा याबद्दल वारंवार आग्रह करूनही त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. चीनच्या शांघायसारख्या शहरांमध्ये कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीची आम्हाला जाणीव आहे. त्यामुळे चीनसाठी पर्यटक व्हिसा पुन्हा सुरू करण्यासाठीची ही योग्य वेळ नाही. चीनने भारतीय विद्यार्थ्यांचे व्हिसा २०२० पासूनच रद्द केले असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
पंतप्रधान मोदींच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आक्षेप घेणाऱ्या पाकिस्तानलाही प्रवक्ते बागची यांनी खरमरीत शब्दांत फटकारले. पंतप्रधानांच्या दौऱ्यावर टिप्पणी करण्याचा पाकिस्तानला कोणताही अधिकार नाही. सोबतच, दहशतवादाच्या वातावरणात पाकिस्तानशी चर्चा होऊ शकत नाही असे त्यांनी नमूद केले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.