नवी दिल्लीः केंद्राच्या महत्त्वाकांक्षी चित्ता पुनर्वसन प्रकल्पातंर्गत दक्षिण आफ्रिका व नामिबियातून भारतातल्या मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आणलेल्या चित्त्यांचा संघर्ष अजूनही सुरूच आहे. या उद्यानातील बिबट्यांची अधिक संख्या व पुरेशी शिकार उपलब्ध न होण्याच्या आव्हानांचा त्यांना सामना करावा लागत आहे. त्यामुळे, कुनोनंतर मध्य प्रदेशातीलच गांधीसागर वन्यजीव अभयारण्यातील चित्त्यांचे स्थलांतर लांबले आहे. हे अभयारण्य चित्त्यांचे दुसरे वसतिस्थान असेल.
चित्ता प्रकल्पाच्या सुकाणू समितीच्या बैठकीतील नोंदीवरून ही बाब उघड झाली आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये भारतात आणलेल्या या चित्त्यांसाठी शिकारीत वाढ करणे व बिबट्यांच्या संख्येचे व्यवस्थापन करण्याची गरज त्यातून अधोरेखित झाली आहे. तीन चित्त्यांचा मृत्यू झाल्यानंतर गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये चित्त्यांना पुन्हा खुल्या जंगलातून बंदिस्त अधिवासात आणले होते. मात्र, शिकारीसाठी कमी सावज उपलब्ध असणे, हेही त्यांचा बंदिस्त अधिवासातील मुक्काम वाढण्याचे कारण आहे. यावर अंतरिम तोडगा म्हणून कुनो व गांधीसागर या दोन्ही उद्यानांत शिकारीचे प्रमाण वाढविले जात आहे. मात्र, स्थलांतर करून कायमस्वरूपी शिकारीचे प्रमाण वाढविता येत नाही, याची काळजीही तज्ज्ञांना भेडसावत आहे. दोन्ही उद्यानांतील बिबट्यांची वाढती संख्या हीही आणखी एक डोकेदुखी असून बिबट्यांच्या स्थलांतरासाठीही तातडीने पावले उचलली जात आहेत.
जूनमध्ये झालेल्या बैठकीत मंदसौरचे विभागीय वनाधिकारी संजय रायखेरे यांनी सांगितले होते, की गांधीसागर अभयारण्यातील ६४ चौ.कि.मीच्या बंदिस्त अधिवासात २४ बिबटे असून चित्त्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी त्यातील १५ बिबट्यांना तेथून हलविण्यात आले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली होती. त्याचप्रमाणे, चित्त्यांच्या शिकारीसाठी अधिवासात सुधारणा करण्यासाठी कुनोत पाच हजार हेक्टर क्षेत्रांत गवताचे पुनरुज्जीवन करण्यासाठी ३.७५ कोटींचा खर्च करण्यात आला आहे. याच बैठकीत भारतीय वन्यजीव संस्थेचे संशोधक कमर कुरेशी यांनी गांधीसागर अभयारण्यात चिंकाराची संख्या कमी असल्यावर चिंता व्यक्त करत बिबट्यांची संख्या कमी करण्याची गरज असल्याचे सांगितले होते.
सूत्रांनी ‘पीटीआय’ला दिलेल्या माहितीनुसार, गांधीसागर अभयारण्य अद्याप चित्त्यांसाठी पूर्णपणे तयार नाही. बिबट्यांची संख्या आणि शिकारीची आव्हाने आहेत. अभयारण्यातील बंदिस्त अधिवासात बिबट्यांचा चित्त्यांशी संघर्ष होऊ नये म्हणून कुंपण उभारण्यात येत आहे. अधिवासाच्या आत तसेच बाहेर शिकारीचे प्रमाण वाढविण्याचीही गरज आहे.
गांधीसागरमध्ये चित्त्यांच्या स्थलांतरासाठी बनविलेल्या कृती आराखड्यानुसार पहिल्या टप्प्यात बंदिस्त अधिवासातील कुंपण घातलेल्या भागात पाच ते आठ चित्ते सोडले जातील. कुनो-गांधीसागर उद्यानांतील चित्त्यांची एकूण संख्या ६० ते ७० ठेवण्याचे दीर्घकालीन उद्दिष्ट आहे.
उद्यानांत एकाचवेळी बिबट्या, सिंहांचेही अस्तित्व असल्याने चित्त्यांच्या वावरावर तसेच जागेचा वापर करण्यावर मर्यादा येऊ शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. अपवादात्मक अशा वेगाने धावणारा अत्यंत चपळ प्राणी म्हणून चित्त्याची ओळख आहे. ते प्रामुख्याने खुल्या अधिवासात शिकार करतात. याविरुद्ध बिबट्या विविध अधिवासांना चांगल्या प्रकारे जुळवून घेऊ शकतो. त्याचा आहारही चित्त्यापेक्षा मिश्र आहे. त्यामुळे, चित्ता बिबट्यांशी थेट संपर्क टाळतो. ते बिबट्या कमी सक्रिय असलेला अधिवास व वेळ निवडतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.