नवी दिल्ली : भारतातील जातीयवादाचा भेसूर चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. कारण टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिला हॉकीच्या सेमी फायनलमध्ये अर्जेंटिनाविरुद्धच्या सामन्यात भारतीय महिलांच्या टीमला पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर टीममधील खेळाडू वंदना कटारिया हीच्या कुटुंबियांना जातीयवादी कृत्यांचा सामना करावा लागला. हरिद्वार इथं घडलेल्या या घटनेत सवर्ण समाजातील लोकांनी कटारिया कुटुंबियांना जातीवरुन शिविगाळ केली. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं पण अद्याप त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही. टाईम्स ऑफ इंडियानं याबाबत वृत्त दिलं आहे.
याप्रकरणी माहिती देताना पोलीस अधिकारी एल. एस. बुटोला म्हणाले, "टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिलांच्या हॉकी टीमला पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर या संघातील खेळाडू वंदना कटारिया हीच्या कुटुंबावर हरिद्वार येथील दोन पुरुषांनी जातीयवादी टिपण्णी केली. त्यांनी म्हटलं की, "भारतानं सामना यामुळं गमावला कारण टीममध्ये खूपच जास्त दलित खेळाडू होते." त्याचबरोबर सामना हारल्यानंतर रोशनाबाद येथील वंदनाच्या घराबाहेर लोकांनी फटाके वाजवले, हे पाण्यासाठी आम्ही घराबाहेर आलो तर आमच्या ओळखीतले सवर्ण समाजातील दोन पुरुष आमच्या घरासमोर नाचत होते," असं वंदनाचा भाऊ शेखर यांनं सांगितलं.
शेखरने पोलिसांमध्ये तक्रार देताना म्हटलं की, "या पुरुषांनी त्यांच्या कुटुंबियांचा अपमान केला. हे पुरुष म्हणत होते की, केवळ हॉकीमधूनच नव्हे तर प्रत्येक खेळातून दलितांना हाकलून द्यायला हवं. यानंतर ते पुरुष आपल्या अंगातील कपडे काढून पुन्हा नाचू लागले. हा आमच्यावर झालेला जातीयवादी हल्ला होता. ऑलिम्पिकमध्ये भारताच्या महिला हॉकीच्या टीमला पराभवाचा सामना करावा लागला यामुळे आम्ही कुटुंबीय निराश झालो होतो पण ज्या प्रकारे आपली टीम खेळली त्याचा आम्हाला अभिमान वाटत होता" असंही शेखरनं यावेळी सांगितलं.
दरम्यान, या घटनेवर भाष्य करताना स्वराज इंडियाचे योगेंद्र यादव म्हणाले, "केवळ दलित असल्यानं केलेली टिपण्णी हा देशाच्या महिला नायकाचा अपमान आहे. दलित मुलींवर बलात्कार होतो, त्यांचा खून होतो तरी आपण म्हणतो 'जात' अस्तित्वात नाही. आता सकाळी वंदना कटारियाची बातमी ऐकायला मिळाली जिनं क्वार्टर फायनलमध्ये गोलची हॅटट्रिक केली होती."
त्याचबरोबर ऑल इंडिया महिला काँग्रेसने देखील यावर ट्विट करुन हा लाजीरवाणा प्रकार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. "महिला खेळाडूवर अशा प्रकारे जातीयवादी टिपण्णी करणे ही मानसिक आजारी असल्याची लक्षण आहेत. काँग्रेसच्या राष्ट्रीय संयोजक (सोशल मीडिया) रुचिरा चतुर्वेदी म्हणाल्या, देश म्हणून आपण वंदना कटारियाचे उपकार आणि तिच्या कुटुंबियांची माफी मागायला हवी" या प्रकरणात तात्काळ एफआयआर दाखल का झाली नाही.? असा सवालही त्यांनी केला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.