नवी दिल्ली : भारतीय रेल्वे सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडित आहे. देशातील लाखो लोक दररोज रेल्वेने प्रवास करतात. मात्र, बऱ्याचदा रेल्वेच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित केले जातात. त्यानंतर आता रेल्वेच्या अंर्तगत बाबी सुधारण्यासाठी रेल्वेकडून सुरु असलेल्या कामाच्या ठिकाणी जाण्यास रेल्वेने वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.
रेल्वेची कामे सुरु असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी भारतीय रेल्वेकडून दर पंधरा दिवसांतून दोनदा असे दोन दिवसीय शिबिराचे आयोजन केले जाणार आहे. ज्या ठिकाणी रेल्वेशी संबंधित कामे होत असतील, त्याठिकाणी या शिबिराचे आयोजन केले जाणार आहे. संबंधित कामे पूर्ण करण्यासाठी आणि त्यासाठी दिशा देण्याचे काम या शिबिराच्या माध्यमातून केले जाणार आहे. याबाबत रेल्वे विभागाने मागील महिन्यात वरिष्ठ प्रशासकीय श्रेणीतील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या सर्व अधिकाऱ्यांना विभागवार कामे देण्यात आली आहेत. या शिबिरादरम्यान ट्रॅकचे नूतणीकरण, पूलाची पुनर्बांधणी, प्लॅटफॉर्मची वाढ आणि इतर ट्रॅकच्या देखभालीची कामे केली जाणार आहे.
''नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांनी नियमितपणे विभागात सुरु केलेल्या शिबिरात जाणे गरजेचे आहे. त्यानंतर त्यांच्याकडून याबाबतचे योजना आणि कामाचे नियोजन कसे करायचे, याचे मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी दर पंधरवड्यात दोनदा जाणे गरजेचे आहे. हे शिबिर मार्च 2018 पर्यंत असणार आहे'', असे त्या पत्रकात म्हटले आहे.
दरम्यान, रेल्वेच्या या नव्या योजनेमुळे रेल्वेच्या सेवेत सुधारणा होणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.