अहमदाबाद - हवाई दलाने मागील आठवड्यात पाकिस्तानात जाऊन केलेली कारवाई ही भारताची अखेरची कृती समजण्याची चूक कोणीही करू नये. दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई करताना मोठे निर्णय घेण्यास आम्ही कचरणार नाही, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाकिस्तानला अप्रत्यक्षपणे इशारा दिला. भारतातील दहशतवादी कारवायांना जबाबदार असलेल्यांना घरात घुसून मारू, असेही मोदी म्हणाले.
येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना मोदी यांनी हे वक्तव्य केले. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळावर २६ फेब्रुवारी रोजी केलेल्या हल्ल्याचा संदर्भ देत मोदी म्हणाले की, एक काम संपल्यानंतर माझे सरकार झोपा काढत नाही, तर ते दुसऱ्या कामासाठी सज्ज होते. या वेळी मोदी यांनी विरोधकांवरही निशाणा साधला.
ते म्हणाले, ‘‘पाकिस्तानातील माध्यमांना आनंद होईल अशी विधाने करण्याचे विरोधकांनी टाळायला हवे. विरोधी पक्षांनी देशाच्या संरक्षण दलांना नावे ठेवण्याचेही बंद करावे. विरोधी पक्षांचे नेते सध्या जे बोलत आहेत, त्याची पाकिस्तानात हेडलाइन होते.
भारतातील दहशतवादी कारवायांना जबाबदार असलेल्यांना त्यांच्या घरात घुसून मारण्याचे आमचे धोरण आहे, असे स्पष्ट करत मोदी म्हणाले की, पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्युत्तरादाखल भारताने केलेल्या कारवाईचा आगामी लोकसभा निवडणुकीशी संबंध जोडू नये. ही कारवाई निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून केलेली नाही. २०१६ मध्ये भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकवेळी कुठेही निवडणुका नव्हत्या.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.