नवी दिल्ली : सध्या कॉंग्रेस पक्षाची घडी पुन्हा एकदा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे, या दरम्यान राजस्थानमधील उदयपूर शहरात होणाऱ्या काँग्रेस (Congress) पक्षाच्या चिंतन शिबिरात 'एक कुटुंब-एक तिकीट' हा नियम काही अटींसह लागू करण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. या आठवड्याच्या अखेरीस उदयपूर येथे होणाऱ्या या शिबिरात पक्षाचे प्रमुख सदस्य आगामी निवडणूकांसाठी रणनीतीवर चर्चा करणार आहेत. त्यामध्ये या नियमाला मंजूरी दिली जाण्याची शक्यता आहे.
सोमवारी झालेल्या सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा विवादीत मुद्दा चर्चेसाठी ठेवण्यात आला होता, अशी माहिती कॉंग्रेसच्या नेत्याने दिली. पक्षाकडून या निर्णयाला मंजूरी देण्यात आली तर, हा नियम गांधी परिवाराला मात्र लागू नसेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. एनडीटिव्हीव्हिने दिलेल्या रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे.
एका कॉंग्रेसच्या नेत्याने सांगितले की, सामूहिक निर्णय घेण्यास मदत करण्यासाठी पक्ष संसदीय मंडळाचे पुनरुज्जीवन करण्यासंबंधी हालचालींची सुरुवात देखील केली जाऊ शकते. यासोबतच 2024 च्या निवडणुकीत भाजप आणि द्वेषाच्या राजकारणाचा मुकाबला करण्यासाठी पक्षाने सर्व पक्षांना या बैठकीत आवाहन केले. काँग्रेस पक्ष बेरोजगारी आणि वाढत्या महागाईवर लक्ष केंद्रित करेल आणि गेल्या काही निवडणुकांप्रमाणे मुख्य मुद्द्यावर फूट पाडणाऱ्या आणि जातीयवादी प्रचाराचे वर्चस्व होऊ देणार नाही.
यासोबतच, पक्ष सरचिटणीस यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र निवडणूक शाखा आणि पक्षाच्या नेत्यां-कार्यकर्त्यांसाठी निवडणूक प्रचाराचे व्यवस्थापन आणि समन्वय साधण्यासाठी प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचा विचारही केला जाऊ शकतो. उदयपूरच्या चिंतन शिबिरात यासर्व प्रस्तावांवर चर्चा होणार असल्याचे पक्षाच्या नेत्यांनी सांगितले आहे.
काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, एकूण 422 नेते चिंतन शिबिरात सहभागी होणार आहेत. त्यांनी सांगितलं की, "काँग्रेस कार्यकारिणीचे सर्व सदस्य, विशेष निमंत्रित व स्थायी निमंत्रित सदस्य, प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, विधीमंडळ पक्षाचे नेते, माजी केंद्रीय कॅबिनेट मंत्री, माजी राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव, सहसचिव, पक्षाच्या विविध विभागांचे प्रमुख, महिला काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, एनएसयूआयचे सर्व पदाधिकारी आणि समन्वय समितीचे सदस्य आणि काँग्रेस अध्यक्षांनी निवडलेले लोक यात सहभागी होणार आहेत.
50% सहभागी 50 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत आणि त्यापैकी जवळजवळ निम्मे 40 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. यापैकी 21 टक्के महिला आहेत. भारतातील विविधतेचे दर्शन घडावे यासाठी समाजातील विविध घटकांतील लोकांनाही पाचारण करण्यात आले आहे. ते म्हणाले, सीडब्ल्यूसीच्या बैठकीत दोन निर्णय घेण्यात आले. डिजिटल सदस्यत्व मोहीम जवळपास संपली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या घटनेत दुरुस्ती करण्याची गरज होती आणि ती मंजूर करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.