Rahul Gandhi sakal
देश

Rahul Gandhi : तुम्ही केलेल्या निर्व्याज प्रेमाबद्दल आभार..!;राहुल गांधी यांचे वायनाडच्या जनतेला भावनिक पत्र

रायबरेली मतदारसंघ कायम ठेवून वायनाडची जागा सोडून देणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वायनाडवासीयांना पत्र लिहीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

प्रशांत पाटील

नवी दिल्ली : रायबरेली मतदारसंघ कायम ठेवून वायनाडची जागा सोडून देणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वायनाडवासीयांना पत्र लिहीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अनोळखी असतानाही येथील जनतेने प्रेम केले व विश्‍वास ठेवला, याबद्दल राहुल यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. रायबरेली आणि वायनाड या दोन्ही जागांवर विजयी झालेल्या राहुल यांना नियमानुसार एक जागा सोडून देणे भाग होते. त्यांनी सोडलेल्या वायनाडच्या जागेवर त्यांच्या भगिनी व काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी पोटनिवडणूक लढविणार आहेत. या पार्श्वभूमीवर राहुल यांनी वायनाडमधील जनतेला पत्र लिहीत ही जागा सोडून देताना झालेले दु:ख आणि इतर भावना व्यक्त केल्या आहेत.

वायनाडमधील माझ्या प्रिय बहिण-भावांनो,

तुम्ही सर्वजण ठिक असाल, अशी आशा आहे. माध्यमांसमोर माझ्या निर्णयाबाबत माहिती देताना तुम्हाला मी उदास झाल्याचे दिसलेच असेल. मी का दु:खी आहे? पाच वर्षांपूर्वी माझी आणि तुमची ओळख झाली होती. मी पहिल्यांदाच ज्यावेळी तुमच्याकडे आलो त्यावेळी तुमच्याकडून पाठिंबा मिळण्याची मला आशा होती. मी तुमच्यासाठी अनोळखी होतो, तरीही तुम्ही माझ्यावर विश्‍वास ठेवला. तुम्ही माझ्यावर मनापासून प्रेम करत जवळ केले. तुम्ही कोणत्या राजकीय विचारसरणीचे, कोणत्या समुदायाचे, धर्माचे किंवा भाषा बोलणारे होता, त्यामुळे कोणताही फरक पडला नव्हता. मी ज्यावेळी रोजच अपमान सहन करत होतो, त्यावेळी तुमच्या निर्व्याज प्रेमानेच मला धीर दिला होता. तुम्हीच माझ्यासाठी आश्रय, घर आणि कुटुंब बनला होतात. माझ्यावर तुमचा विश्‍वास नाही, असे मला एकदाही वाटले नाही.

केरळमध्ये पूर आला होता, त्यावेळी मी जे पाहिले ते कधीही विसरू शकत नाही. अनेक कुटुंबांनी सर्व काही गमावले होते. तरीही तुमच्यापैकी कोणीही, छोट्या मुलांनीही, आपला आत्मसन्मान सोडला नव्हता. मला या अगणित स्मृतीसुमनांची आठवण राहील; तुम्ही मला अनेकदा प्रेमाने जवळ घेतले, मी ते लक्षात ठेवेन. त्यात नाजूक प्रेम सामावलेले होते. माझ्या भाषणांचा हजारो लोकांसमोर अनुवाद करून सांगणाऱ्या मुलींचे धाडस, सौंदर्य आणि आत्मविश्‍वास मी कधीच विसरू शकत नाही.

संसदेत तुमचा आवाज म्हणून वावरणे, ही अत्यंत आनंद आणि सन्मानाची बाब होती. मी दु:खी आहे, पण माझी बहिण आता तुमचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तेथे असेल, यामुळे जरा दिलासा मिळत आहे. तुम्ही तिला संधी दिली तर ती चांगले काम करेल, याबाबत मला विश्‍वास आहे. रायबरेली आणि वायनाडच्या लोकांना साक्षी ठेवून मी संकल्प करतो की आपण मिळून देशातून द्वेष आणि हिंसाचाराला पराभूत करू. तुम्ही माझ्यासाठी जे काही केले, त्यासाठी आभार कसे मानू, ते मला समजत नाही. मला ज्यावेळी प्रेम आणि सुरक्षेची सर्वाधिक गरज होती, त्यावेळी तुम्ही जी साथ दिली त्यासाठी धन्यवाद. तुम्ही माझ्या परिवाराचा भाग आहात आणि तुमच्या प्रत्येकासाठी मी कायम असेनच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NavIC: आता भारतीयांना रस्ता गुगल मॅप्स नाही, तर'नाविक' सांगणार; सरकारची नेमकी योजना काय?

Narayangaon News : पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी; एक किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Mahadev Jankar : सरकार शक्तिपीठ महामार्गाला तरतूद करते, मात्र निवडणूक आश्वासनातील कर्जमाफीला तरतूद करत नाही

JDU Expelled Leaders: मोठी बातमी! निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाकडून ११ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, कारण काय?

ICC Womens World Cup 2025 : ठरलं! भारत सेमीफायनलमध्ये अपराजित ऑस्ट्रेलियाशी भिडणार; द. आफ्रिकेला हरवत कांगारूं पाँइंट्स टेबलमध्ये अव्वल...

SCROLL FOR NEXT