नवी दिल्ली - निवडणुकीच्या हंगामात भाजपकडे इतर पक्षीय नेत्यांचा वाढता कल असला, तरी या नेत्यांना घेण्याआधी त्यांची पार्श्वभूमी तपासून त्यांचे योग्य मूल्यमापन वा मूल्यांकन करा, असे पक्षनेतृत्वाने राज्यांच्या प्रभारींना बजाविल्याची खात्रीलायक माहिती समजली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या "महाजनादेश' यात्रेच्या 31 ऑगस्टला (शनिवारी) सोलापुरात होणाऱ्या समारोपावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित राहावे, अशी विनंती राज्यातर्फे करण्यात आली आहे. फडणवीस यांनी काल रात्री दिल्लीवारी करून गृहमंत्री आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांना हीच आग्रही विनंती केली होती. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रासह हरियाना, झारखंड आणि दिल्लीच्या निवडणूक प्रभारी नेत्यांची बैठक आज भाजप मुख्यालयात झाली. तीत शहा यांनी भाजपमध्ये येणाऱ्यांबाबत हा सावधानतेचा इशारा दिल्याचे सूत्रांनी सांगितले. आज सुमारे दीड तास चाललेल्या बैठकीत विधानसभा निवडणुकांच्या तयारीचा व प्रचाराच्या सूत्राचा आढावा घेण्यात आला. "खंबीर नेतृत्व, लांगुलचालनाच्या राजकारणाला तिलांजली व अतिशय दृढ राजकीय इच्छाशक्तीमुळेच काश्मीरचे घातक कलम 370 रद्द झाले,' ही भाजपच्या प्रचाराची महत्त्वाची "थीमलाइन' असणार असल्याचेही स्पष्ट झाले. महाराष्ट्रासह तिन्ही राज्यांत अनुक्रमे फडणवीस, मनोहर लाल खट्टर व रघुवर दास हेच भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील, यावरही केंद्रीय नेतृत्वाने शिक्कामोर्तब केले. आजच्या बैठकीला कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा व संघप्रतिनिधी म्हणजेच संघटनमंत्री बी. एल. संतोष यांच्यासह महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव, प्रभारी सरोज पांडे, हरियानाचे ओम माथूर, दिल्लीचे प्रकाश जावडेकर, झारखंडचे ओम माथूर, हरियानाचे अनिल जैन व नरेंद्रसिंह तोमर उपस्थित होते. फडणवीस यांची प्रशंसा दोन टप्प्यांत झालेल्या या बैठकीच्या पहिल्या टप्प्यात एकत्रित प्रचारसूत्रावर व दुसऱ्या टप्प्यात राज्यवार प्रश्नांवर चर्चा झाली. सूत्रांच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील पूर परिस्थिती हाताळण्याबाबत फडणवीस सरकारच्या कामगिरीची केंद्रीय नेतृत्वाने प्रशंसा केली. या महापुरात सर्वस्व गमाविलेल्या हजारो कुटुंबांना मदतीसाठी कॉर्पोरेट क्षेत्राला मदतीसंदर्भात एक समन्वित आवाहन करण्याबाबतही मंथन करण्यात आले. मुख्यत्वे मोदी व राज्यपातळीवर फडणवीस यांच्या चेहऱ्यांसह निवडणुकीला सामोरे जाण्याचे भाजप नेतृत्वाने निश्चित केल्याचे स्पष्ट आहे. |