दिवाळी सुटी संपल्यानंतर 11 नोव्हेंबरपासून पहिलीपासूनच्या शाळा उघडणार आहेत.
सोलापूर : राज्यातील कोरोनाची (Covid-19) दुसरी लाट ओसरली असून, सोलापूरसह राज्यातील 17 जिल्ह्यांमधील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या खूपच कमी झाली आहे. या पार्श्वभूमीवर दिवाळी (Diwali) सुटी संपल्यानंतर 11 नोव्हेंबरपासून पहिलीपासूनच्या शाळा (School) उघडणार आहेत. परंतु, विद्यार्थ्यांची 100 टक्के उपस्थिती असावी, गणवेश सक्ती, असे निर्बंध नसतील, अशी माहिती शालेय शिक्षण विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
राज्यातील नंदुरबार, धुळे, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली हे जिल्हे कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर आहेत. कोरोनामुळे राज्यातील पहिली ते चौथीचे वर्ग मार्च 2019 पासून पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे ज्यांच्याकडे अँड्रॉईड मोबाईल नाहीत, ते विद्यार्थी मागील दीड वर्षापासून शिक्षणापासून दूर आहेत. शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या वाढू नये, बालविवाहाला चाप बसावा, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया मजबूत व्हावा, शिक्षणाची गोडी कायम राहावी, या हेतूने आता राष्ट्रीय शिक्षण दिनाचे (11 नोव्हेंबर) औचित्य साधून पहिलीच्या पुढील सर्वच वर्ग सुरू केले जाणार आहेत.
दरम्यान, सध्या शहरातील आठवीच्या पुढील वर्ग सुरू आहेत. आता शहरांमधील पाचवीपासूनचे पुढील वर्ग सुरू करण्याच्या दृष्टीनेही तयारी सुरू आहे. दुसरीकडे, ग्रामीण भागातील पहिलीच्या पुढील वर्ग सुरू केले जाणार आहेत. पालकांनी तशी मागणीदेखील केली असून शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने सकारात्मक वातावरण तयार झाल्याचेही शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले. तरीही, राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेऊन पहिलीपासूनचे वर्ग करण्यासंदर्भात राज्य स्तरावरून काही दिवसांत अंतिम निर्णय जाहीर होणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी सर्व जिल्ह्यांमधील जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्याध्यापकांशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेतली आहेत.
निकषांसंदर्भात ठळक बाबी...
शाळांमध्ये विद्यार्थ्यांना 100 टक्के उपस्थितीचे बंधन नाही
कोणत्याही शाळांनी विद्यार्थ्यांना गणवेश सक्ती करू नये
प्रत्येक शाळेत थर्मल गन, सॅनिटायझरची सोय असावी
दोन विद्यार्थ्यांमध्ये किमान सहा फुटांचे अंतर (सोशल डिस्टन्सिंग) बंधनकारक
प्रत्येक विद्यार्थ्याकडे मास्क असायलाच हवा; पालकांच्या संमतिपत्राचे बंधन नाही
दिवाळी सुटी संपल्यानंतर सकाळी दहा ते सायंकाळी सव्वापाच या वेळेत प्राथमिक शाळा भरतील. पहिलीपासूनचे वर्ग 11 नोव्हेंबरपासून सुरू केले जाणार आहेत. सर्वांनी मिळून विद्यार्थ्यांच्या आरोग्यालाच पहिले प्राधान्य द्यावे, असे नियोजन केले आहे.
- किरण लोहार, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.