पालू (इंडोनेशिया) (पीटीआय) : भूकंप आणि सुनामीमुळे इंडोनेशियामध्ये प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून, त्या देशाने आता आंतरराष्ट्रीय समुदायाकडे मदत मागितली आहे. सुनामीच्या तडाख्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या सुमारे एक हजारहून अधिक नागरिकांच्या दफनविधीचे आव्हान स्वयंसेवकांसमोर आहे. सुनामीमुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या समुद्र किनाऱ्यालगतच्या पालू शहराजवळील पोबोया येथे सुमारे शंभर मीटर लांबीचा खड्डा खोदण्यात आला असून, त्यात सर्व मृतदेहांचे सामूहिक दफन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. सुमारे एक हजार 300 मृतदेहांच्या दफनाची व्यवस्था करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
अद्यापही अनेक ठिकाणी मदत पथके पोचलेली नसून, अनेक दुर्गम भागात पोचण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे सुनामीमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. सरकारी आकडेवारीनुसार सुनामीच्या संकटात बळी गेलेल्यांची संख्या 832 असली, तरी ती वाढण्याची शक्यता गृहीत धरून त्यांच्या दफनविधीची तयारी केली जात आहे.
दरम्यान, या संकटाचा मुकाबला करण्याची आमची क्षमता असल्याचा सुरवातीला दावा करणाऱ्या इंडोनेशियाच्या प्रशासनाकडून आता मदतीसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्था आणि संघटनांना आवाहन करण्यात आला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.