न्यूयॉर्क : अफगाणिस्तानमधील परिस्थिती अत्यंत गंभीर असून या देशात पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या छावण्या उभ्या राहिल्यास त्याचा जगावर आणि विशेषत: भारतावर थेट परिणाम होणार असल्याची प्रतिक्रिया भारताने आज संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीमध्ये व्यक्त केली. सुरक्षा समितीचे अध्यक्षपद या महिन्यात भारताकडे आहे.
संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे राजदूत टी. एस. तिरुमूर्ती यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले,‘‘ अफगाणिस्तानमध्ये हिंसाचार वाढत असून ही चिंताजनक बाब आहे. या देशात मे आणि जूनमध्ये संघर्षात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत बळी पडलेल्यांपेक्षा अधिक आहे. स्वतंत्र, शांततापूर्ण आणि स्थिर अफगाणिस्तान हे चित्र भारताला हवे आहे. तेथे पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या छावण्या उभ्या राहिल्यास भारताला त्याचा थेट धोका आहे. अफगाणिस्तानमध्ये महिला, मुले आणि अल्पसंख्याकांवरही हल्ले होत आहेत. गेल्या २० वर्षांत दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईमुळे झालेला बदल धुळीला मिळणार नाही, याची खबरदारी सर्व जगाला घ्यायची आहे.’’
म्यानमारमधील अस्थिरता आणखी वाढविणारा हस्तक्षेप आंतरराष्ट्रीय समुदायाकडून अपेक्षित नाही, अशी स्पष्ट भूमिका भारताने सुरक्षा परिषदेत घेतली. म्यानमारमध्ये सध्या लष्करी राजवट सुरु असून त्याविरोधात आंदोलनही सुरु आहे. म्यानमारमधील हिंसाचाराचा भारत निषेध करत असून लोकशाहीच्या मार्गावरून म्यानमारने दूर जाऊ नये. लष्करी राजवटीनेही राजकीय नेत्यांची मुक्तता करून चर्चेतून मार्ग काढावा, असे आवाहनही तिरूमूर्ती यांनी केले.
आपल्या एका महिन्याच्या अध्यक्षपदाच्या काळात भारताकडून दहशतवाद, सागरी सुरक्षा आणि शांतता मोहिमा या मुद्द्यांवर भर दिला जाणार आहे. सागरी सुरक्षा या विषयावर ९ ऑगस्टला खुली चर्चा होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी या चर्चेच्या अध्यक्षस्थानी असतील. ते दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होतील. १८ तारखेला होणाऱ्या आणखी एका खुल्या चर्चेच्या अध्यक्षस्थानी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर असणार आहेत. १९ ऑगस्टला ‘इसिस’वरील एका अहवालावरील चर्चेचे अध्यक्षपदही ते भूषवतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.