राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला असून काही गावं पाण्याखाली गेली आहेत. दिवसभरातील महाराष्ट्रातील दहा महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेऊयात..
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळई गावात दरड कोसळून जवळपास ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तळई गावात एनडीआरएफची टीम पोहोचली असून बचावकार्य सुरू आहे. या गावाच्या आसपासच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे. मुंबईतील गोवंडी भागात इमारत कोसळून ४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेत दहा जण जखमी झाले आहेत. मुंबईत रेल्वे व रस्ते वाहतुकीवरही पावसाचा परिणाम झाला आहे. साताऱ्यात देवरुखवाडीवर दरड कोसळून पाच घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली. रेस्क्यू ऑपरेशनमध्ये २७ नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. मात्र दोन महिला अजूनही बेपत्ता आहेत. २७ नागरिकांना वाचविण्यात जरी यश मिळालं असलं तरी दरड कोसळल्याने २० ते २५ जनावरे दगावली आहेत. पाटण तालुक्यातील मोरणा विभागात असलेल्या आंबेघर इथे दरड कोसळली. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून काही घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली आहेत. स्थानिक ग्रामस्थांनी याठिकाणी मदतकार्य सुरू केले आहे. मात्र मुसळधार पावसामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. रायगड: पोलादपूर तालुक्यातील गोवेले ग्रामपंचायत हद्दीमधील सुतारवाडी येथे गुरुवारी (22 जुलै) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. यावेळी कोसळलेल्या दरडीखाली सुमारे आठ ते दहा घरांचे नुकसान झाले असून आणखी काही घरे दरडींसोबत उतारावर वाहून गेली. पोलादपूरात केवनाळे येथे 6 तर गोवेले सुतारवाडी 5 असे एकूण 11 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
पुणे शहरासह उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली. पाऊस वाढल्याने खडकवासला धरणातील विसर्ग वाढवावा लागला आहे. दुपारी एक वाजता तीन हजार ४१२ क्यूसेक पर्यंत विसर्ग वाढविण्यात आला आहे.खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने मुठा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून त्याबरोबर मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाहून आली आहे. नदीच्या पाण्यासह वाहून आलेली जलपर्णी भिडे पुलामध्ये अडकली आहे. म्हणून नदीपात्रातून होणारी वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली तसेच पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला.
कोल्हापूरातील सांगली फाटा येथील पुणे बंगळुरू महामार्गावर पुराचे पाणी आल्याने येथून पुढे जाणारी वाहतूक बंद आहे. त्यामुळे पुण्याहून पुणे-सातारा महामार्गाने कोल्हापूर आणि सांगलीकडे जाणारी वाहतूक थांबविण्यात आली आहे. महामार्ग पोलिसांकडून खेड-शिवापूर टोल नाक्यावरून कोल्हापूर सांगलीकडे निघालेल्या वाहनांना मागे वळविण्यात येत आहे.
कोल्हापुरात पंचगंगा नदी धोका पातळीकडे जात असताना पूरग्रस्तांचे स्थलांतर केले जात आहे. शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना स्थलांतरित करण्याचे काम वेगाने सुरू आहे. जिल्ह्यात आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट असल्याने अनेक कुटुंबीयांना स्थलांतरित करण्यास एनडीआरएफच्या टीमसह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन काम करीत आहे.
राज्यभर मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. विशेषत: राज्यातील 13 जिल्ह्यांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. कृषी विभागाच्या नजर अंदाज अहवालानुसार पावसामुळे राज्यातील अंदाजित पावणेदोन लाख हेक्टरवरील शेतीपिकांचे जवळपास 12 हजार कोटींहून अधिक नुकसान झाले आहे. अमरावती, वाशिम, ठाणे, रत्नागिरी, पालघर, रायगड, परभणी, नांदेड, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यांमधील पिकांना मोठा फटका बसला असून अनेकांची शेती वाहून गेली आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली आहेत. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.