नागपूर: गेल्या आठवडाभर सुरु असलेले पावसाचे तांडव जिल्ह्यात धुमाकूळ घालून गेले. शेतीसोबतच घरांचेही नुकसान झाले. अशा स्थितीत शेतकरी हवालदील झाला. परतीचा प्रवास करताना पावसाने पुन्हा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. एकेका संकटाशी सामना करीत असताना शेतकऱ्यांची अर्धमेल्यासारखी गत झाली आहे.
चिखलापार गावातील घरांमध्ये शिरले पाणी: नदीला मंगळवारी रात्री आलेल्या पुरामुळे व मध्यरात्री २वाजताच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह साधारण पावसाला सुरुवात झाली होती. मात्र, नंतर तीनपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रात्रीचा पाऊस असल्याने नागरिक गाढ झोपेतच होते. घरांच्या अंगणात व रस्त्यावर साचलेल्या पाण्याला जलाशयाचे स्वरूप निर्माण झाले होते. परंतु यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.भिवापूर : तालुक्यातील चिखलापार, पांजरेपार, बेसुर, नांद, मालेवाडा, जवळी, मांगली ( जगताप ) नक्षी, वडद या गावांना भेटी देत नुकसानग्रस्त शेतांची आमदार पारवे यांनी पाहणी केली. यावेळी उमरेडचे उपविभागीय अधिकारी चंद्रकांत खंडाईत, तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी विभागाचे अधिकारी व अन्य अधिकारी सोबत होते. पावसाचा सर्वाधिक फटका सोयाबीन पिकाला बसल्याचे पाहणीत आढळून आले. त्या खालोखाल कापूस, तूर व मीरची या पिकांचे नुकसान झाल्याचे दिसून आले. या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना पारवे यांनी अधिकाऱ्यांना केल्यात. पाहणी दौऱ्यादरम्यान अनेक ठिकाणी अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांचे सांत्वन करुन त्यांना धीर देण्याचे प्रयत्न पारवे यांनी केलेत.चांपा : मागील १५ दिवसांपासून सततच्या पावसामुळे कापणीला आलेल्या सोयाबीन पिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनच्या शेंगा काळ्या पडल्या असून शेंगांमधून अंकुर निघत असल्याने शेतकऱ्यांवरील संकट गडद झाले आहे. शेतात पाणी साचल्याने सोंगणी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. कन्हान : पाच दिवसांपासून कन्हान शहरात झालेल्या पावसामुळे रायनगर कन्हान येथील स्व. विश्वनाथजी रहाटे यांच्या घराची एक भिंत कोसळून नुकसान झाले. सुदैवाने कुठलीही जिवहानी झाली नाही. शुक्रवारपासून (ता.१७)सुरु झालेल्या पावसाने मंगळवारी(ता.२१) सायंकाळी ७.३० वाजता दरम्यान रायनगर प्रभाग क्र.५ कन्हान येथील स्व. विश्वनाथ लक्ष्मणजी रहाटे यांचे घराची एकाकडील भिंत कोसळून घरातील साहित्याचे नुकसान झाले. नगराध्यक्ष करूणाताई आष्टनकर व कन्हानच्या मंडळ अधिकारी यांना माहिती दिली असता मंडळ अधिकारी जगदीश मेश्राम, पटवारी महेंद क्षीरसागर व कोतवाल बंडू वानखेडे घटनास्थळी पोहचले. पंचनामा करून झालेल्या नुकसानीचा अहवाल पारशिवनीच्या तहसीलदारांकडे पाठविणार आहेत. आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसाने तीन ते चार दिवसांपासून जोम धरला. सततच्या पावसामुळे शुक्रवारी सकाळी गुमगाव, वागदरा,कोतेवाडा,धानोली परिसरात वाहणारी वेणा नदी डौलात वाहू लागली असून परिसरातील नाले तुडुंब भरले होते.शेतातील सोयाबीन,तूर आणि कपाशीच्या उभ्या पिकांमध्ये पाणी साचले. पाऊस उसंत घेत नसल्याने गेल्या दोन ते तीन दिवसांपासून शेतीची कामे जवळजवळ बंदच आहे.एकूणच पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.गुमगावः हिंगणा तालुक्यातील शेत शिवारात सध्या सोयाबीनचे पीक सवंगणीवर आले आहे. परंतु गत दोन आठवड्यांपासून संततधार सुरू असलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आणले आहे. तोंडाशी आलेले सोयाबीन पीक हातचे जाते की काय, अशी भीती सध्या निर्माण झाली आहे.नाल्यावरून नदीचे पाणी वाहत असतांना सुद्धा काही दुचाकी वाहनचालक जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडत असून त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.गुमगावच्या अर्धवट पुलाचे काम वेगाने झाले असते तर ही वेळचं आली नसती,अशा चर्चा आता रंगू लागलेल्या आहेत.शेवटी पावसाने उसंत दिल्यानंतर नदीचे पाणी ओसरले. सगळे रस्ते वाहतुकीसाठी खुले झाल्याने काहीसे विस्कळीत झालेले जनजीवन दुपारपर्यंत पूर्वपदावर आले.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.