जळगाव : महापालिका प्रशासनाकडून कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. मनपा प्रशासनाकडे तोडकी यंत्रणा असली तरी मनपा प्रशासन घेत असलेल्या मेहनतीमुळे बहुतांश रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी जात असून मनपाच्या कोविड केअर सेंटरमधील मृत्यूदर शून्य असल्याची माहिती महापौर सौ.भारती सोनवणे यांनी दिली आहे.
शहरात रुग्ण दररोज वाढत असले तरी 1600 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्याच्या दृष्टीने मनपाकडून तयारी करून ठेवण्यात आली असल्याचेही महापौरांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापौर सोनवणे यांनी सर्व यंत्रणेचा आढावा घेऊन आज पत्रकार परिषद घेतली. परिषदेला नगरसेवक कैलास सोनवणे, डॉ.विजय घोलप उपस्थित होते. कोविड विरुद्धच्या लढाईत मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी, डॉ. संजय पाटील, डॉ. शिरीष ठुसे, डॉ. नेहा भारंबे, डॉ. मनिषा उगले यांच्यासह इतर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत आहे. तसेच रेडक्रॉस संस्थेचे विनोद बियाणी, सुभाष सांखला, उज्ज्वला वर्मा यांचे सहकार्य लाभत आहे.
अडचणी तरीही अविरत सेवा
कोरोना हटावसाठी महापालिकेचे 478 अधिकारी कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. कायम डॉक्टर 6, आरसीएच अंतर्गत 5 डॉक्टर, 51 परिचारिका, 9 कंत्राटी वैद्यकीय अधिकारी, 137 शिक्षक, 120 आशा सेविका, 150 अंगणवाडी सेविका हे अनेक ठिकाणी सेवा देत आहे. कुणीही सुट्टी न घेता आपली सेवा बजावत आहे.
140 रुग्ण झाले बरे
महापालिकेकडून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले आहे. शहरात आजपर्यंत 298 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळून आले असून त्यापैकी 24 रुग्ण मयत झाले तर 140 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 98 रुग्णांवर उपचार सुरू आहे. मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये आजवर 198 रुग्ण दाखल झाले असून त्यापैकी 104 रुग्णांवर मनपा प्रशासनाकडून पुर्णतः उपचार केल्यानंतर घरी पाठवण्यात आले आहे. सध्या 58 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांची घेतली जाणारी काळजी, दक्षता यामुळे त्याठिकाणचा मृत्यूदर शून्य असल्याची बाब मनपा प्रशासनासाठी महत्वाचे आहे. शहरात जर अधिक रुग्ण वाढले तर काही हॉस्टेल देखील अधिग्रहित केल्या जाणार असून तशी तयारी मनपाकडून करण्यात आलेली आहे. भविष्यात आणखी काही रुग्ण वाढले तर त्यांना उपचारार्थ दाखल करण्याची उपाययोजना देखील मनपा प्रशासनाने केलेली आहे.
शहरात 80 प्रतिबंधित क्षेत्र
जळगाव शहरात दररोज रुग्ण वाढत असून त्यानुसार प्रतिबंधित क्षेत्र देखील वाढत आहे. आज शहरात 80 प्रतिबंधित क्षेत्र आहेत. एखादा रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानंतर 14 दिवसांनी तो परिसर प्रतिबंधित क्षेत्र मुक्त होऊ शकतो.
दीड लाख नागरिकांची तपासणी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात मनपाकडून सध्या 392 पथकाद्वारे तपासणी केली जात आहे. शहरातील 32,838 कुटुंबातील 1 लाख 46, 241 लोकांची थर्मल स्कॅनरद्वारे तपासणी करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.