रत्नागिरी : केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२० पुरस्काराच्या यादीत रत्नागिरी शहराचा समावेश झाल्याचे जाहीर झाले आहे. जानेवारी २०२० मध्ये देशातील सर्व राज्यांमधील शहरांचा स्वच्छ सर्वेक्षण २०२० पुरस्कारासाठी सर्व्हे करण्यात आला होता. त्यानुसार निकाल तयार झाला असून अंतिम निकालामध्ये महाराष्ट्र राज्यातील काही शहरांचा समावेश आहे. या शहरात रत्नागिरीचाही समावेश आहे. अंतिम निकाल २० ऑगस्ट २०२० रोजी होणाऱ्या कार्यक्रमात जाहीर होणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष बंड्या साळवी आणि मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांनी दिली.
देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी यांचा हस्ते विजेत्यांना पुरस्कार प्राप्त होणार आहे. सदरचा सोहळा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यासोबतच नागरिकांना हा कार्यक्रम युट्यूबच्या माध्यमातून पाहता येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात या सोहळ्याला ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहण्यासाठी व्यवस्था करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या वतीने देण्यांत येणाऱ्या या स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांमध्ये रत्नागिरी शहराचा क्रमांक आल्याने पर्यटन वाढीच्या दृष्टीनेही रत्नागिरी शहर आणि परिसराला एक वेगळं महत्त्व प्राप्त होणार आहे.
नवी मुंबई, कराड, सासवड, लोणावळा, शिर्डी, पन्हाळा, हिंगोली, बल्लारपूर, शेगाव, विटा, इंदापूर, वरोरा, अकोले, जेजुरी, देहूरोड कॅन्टोन्मेंट ह्या शहरांचा ही अंतिम विजेत्यांचा यादीत समावेश आहे. आता रत्नागिरीचा कोणत्या श्रेणीत कोणता क्रमांक येणार याचीच प्रतीक्षा असणार आहे. हा पुरस्कार म्हणजे रत्नागिरीकरांसाठी एक अभिमानाची आणि कौतुकास्पद बाब आहे.
संपादन - स्नेहल कदम
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.