CHAVDAR TALE SAKAL
कोकण

गाळात गेलेल्या विहिरी पुन्हा दिसू लागल्या...

चवदार तळे स्वच्छतेच्या मोहिमेला वेग

सुनील पाटकर

चवदार तळे म्हणजे साक्षात इतिहासाचे धगधगते कुंड. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी सत्याग्रह करून समतेचा संदेश दिला. या तळ्याच्या जलशुद्धीकरणाचा प्रस्ताव असतानाच गेल्या २२ जुलैला महाडमध्ये आलेल्या महापुरामुळे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात माती साचली. पाणीही गढूळ झाले. आता हा गाळउपसा सुरू आहे. या वेळी तळ्यातील ११ विहिरींचा ठेवा पुन्हा दिसू लागला. या ऐतिहासिक वास्तूचे अंतरंग पाहण्याची उत्सुकता असलेल्या अनेकांसाठी हा सुखद धक्काच आहे. या विहिरी पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. त्याचबरोबर या ऐतिहासिक वास्तूचे माहात्म्यही पुन्हा जोरकसपणे चर्चेत आले आहे.

डॉ. आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी चवदार तळे येथे समतेसाठी सत्याग्रह केला. त्यामुळे हे ठिकाणी लाखो नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचे ऐतिहासिक स्थळ ठरले. २२ जुलैला महाडमध्ये महापूर आला. त्या वेळी या तळ्यात मोठ्या प्रमाणात गाळ आणि कचराही शिरला. तो काढण्यासाठी पालिकेने तळ्यातील संपूर्ण पाणी उपसून करून तो स्वच्छ केला. यामुळे तळ्यातील ११ विहिरींचे तब्बल १४ वर्षांनी दर्शन झाले. या तळ्यामध्ये १४ विहिरी आहेत. काही ज्येष्ठ नागरिकांनी त्या पाहिल्या होत्या. फार पूर्वी तळ्याचा वापर संपूर्ण महाड शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी करण्यात येत होता.

शहरासाठी पिण्याच्या पाण्याचे एकमेव स्रोत हे होते. यामुळे हे पाणी उन्हाळ्यात आटून जात असे. अशा वेळी तळ्यामध्ये डवरे (खड्डे) खोदून पाणी काढण्यात येत होते. अशा प्रकारचे १४ डवरे तळ्यात तयार झालेले आहेत. त्यांना १४ विहिरी म्हटले जाते; परंतु त्यांची खोली सात-आठ फुटांपेक्षा अधिक नाही. शहरासाठी नळपाणी योजना सुरू झाल्यानंतर तळ्यातील पाण्याचा वापर पिण्यासाठी कमी झाला. तेव्हापासून तळ्याचे पाणी कधीही आटत नव्हते. त्यामुळे ते नक्की किती खोल आहे, त्याच्या अंतरंगात काय दडले आहे, याची उत्सुकता येथील नागरिकांना आहे.

सध्याचे तळे अडीच एकरमध्ये असून १३६ मीटर लांब आणि ९७ मीटर रुंद; तर साडेपाच मीटर खोल आहे. अनेक वर्षांपूर्वी काठावर सुमारे ३० ते ३५ घाट बांधलेले होते. पिण्याचे पाणी भरण्यासाठी हे घाट वापरण्यात येत होते. पालिकेकडूनदेखील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याचे घाट व कपडे धुण्यासाठी शेड बांधण्यात आल्या होत्या. या घाटावरून पाणी भरले होते, अशी आठवण ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर भुस्कुटे यांनी सांगितली. काही घाट नक्षीदार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाडचा विकास होऊ लागला आणि चवदार तळ्याचा काही भाग बुजवण्यास सुरुवात झाली. तळ्याच्या सुशोभीकरणाच्या दरम्यान हे घाट व काही विहिरी बुजवल्या गेल्या. सद्यस्थितीत चवदार तळ्यामध्ये केवळ तीनच घाट उरलेले आहेत. पूरपरिस्थितीनंतर त्याचे पाणी उपसण्यास सुरुवात झाली. त्यानंतर ११ विहिरींचे दर्शन झाले. समाजमाध्यमांवर ही छायाचित्रे प्रसारित झाली. त्यामुळे या तळ्याचा लौकिक पुन्हा जगात पोहचला. अनेक पालक मुलांना हा ठेवा दाखवण्यासाठी येथे आणू लागले. ते या तळ्याचे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वही मुलांना पटवून देत आहेत. यापूर्वी तळे तीन वेळा पूर्ण उपसण्यात आले होते; परंतु या वेळी मात्र तब्बल १४ वर्षांनी आतील भाग नवीन पिढीला पाहता आला.

...म्हणून ११ विहिरी

महाड पालिकेकडून तळ्याचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. सभागृह व बाग तयार आल्या. तळ्यात उंच कारंजी होती. ती आता बंद आहेत. मध्यभागी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा दहा फुटी पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. सुशोभीकरण, रस्ता व इतर कामांमध्ये तळ्यातील तीन विहिरी मातीत गाडल्या गेल्या. त्यामुळे तळ्यामध्ये सद्यस्थितीत केवळ ११ विहिरीच आहेत.

संघर्ष हीच खरी ओळख

चवदार तळ्याच्या कोसळलेल्या भिंतीमुळे गेल्या काही वर्षांत अनेकदा राजकीय आंदोलनेही झाली. गढूळ व शेवाळयुक्त पाणी टीकेला कारण ठरले; परंतु याच तळ्यावर झालेल्या सत्याग्रहाने अस्पृश्यतेच्या भिंती तोडून टाकल्या होत्या. हेच पाणी कित्येक वर्षांपूर्वी पेटले होते. वेगवेगळ्या माध्यमातून हे तळे आता जरी समाजमाध्यमावर झळकत असले, तरीही मानवाला मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी झालेला संघर्ष हीच खरी चवदार तळ्याची ओळख आहे.

नावाबाबत वेगवेगळे मतप्रवाह

चवदार तळ्याला चवदार तळे हे नाव कसे पडले, याबाबतही वेगवेगळे प्रवाह आहेत. तळ्यामध्ये १४ विहिरी असल्याने त्याचे नाव चवदार तळे पडले असावे; तसेच काहींच्या मते तळ्याचे पाणी चवदार असल्याने तळ्याचे नाव, चवदार तळे झाले असावे, असे सांगितले जाते. या पूर्वी चवदार तळ्याचे नाव चौधरी तळे होते, असा दावाही चवदार खटल्यामध्ये करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : कोल्हापुरात सध्या तणावपूर्ण शांतता

PMC News : महापालिकेची मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी कडक पावले; १७ हजार कोटी रुपये अद्याप येणे, महापालिकेकडून विविध उपाययोजनांवर भर

SCROLL FOR NEXT