climate change Impact fish ocean konkan sindhudurg 
कोकण

धोक्‍याची घंटा! मासेही बदलताहेत आपले अधिवास 

शिवप्रसाद देसाई

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - वातावरण बदलाचा थेट परिणाम माशांच्या अधिवासावर दिसू लागला आहे. यामुळे भविष्यात महाराष्ट्रात मिळणारे काही मासे गायब होऊन वेगळेच मासे मिळू लागल्यास आश्‍चर्य वाटणार नाही. याचा थेट परिणाम मत्स्योत्पादनावर होण्याची भीती आहे. कोकणात सध्या मोठ्या प्रमाणात मिळणारे जेलीफिश, ट्रीगर फिश आणि पेडव्या, बांगड्यासारख्या माशांचा मुंबईपर्यंत झालेला प्रवास याचेच संकेत देत आहेत. 

वातावरण बदलाचा परिणाम कृषी क्षेत्रावर होत असल्याची चर्चा होते; मात्र सागरी जिवांवर याचा खूप मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. समुद्रात तापमानानुसार वेगवेगळे करंट (प्रवाह) असतात. साधारणपणे थंड पाणी खालच्या भागात व उष्ण वरच्या भागात राहते; मात्र पृथ्वी फिरत असल्याने या पाण्याची जागा बदलते. यातून वेगवेगळे प्रवाह तयार होतात. या प्रवाहाचे तापमान वेगवेगळे असते. विविध जलजीव त्यांना आवश्‍यक तापमानानुसार अधिवासाची जागा निश्‍चित करत असतात. 

माशांना प्रामुख्याने 18 ते 26 अंश सेल्सियस इतके तापमान हवे असते. सस्तन प्राण्यांप्रमाणे शीत रक्‍ताच्या असलेल्या माशांमध्ये बदलत्या तापमानानुसार स्वतःच्या शरीरात बदल करण्याची सोय नसते. शरीराला आवश्‍यक इतक्‍या तापमानाच्या पाण्यात ते आपल्या अधिवासाच्या ठिकाणी निवडतात. या पारंपरिक अधिवासात तापमान बदलले, तर ते जागा बदलतात. नैसर्गिक खाद्याची उपलब्धता हाही यातील महत्त्वाचा घटक असतो. 

तापमान वाढीचा आणि वातावरणातील बदलाचा समुद्रातील करंटवर परिणाम जाणवत आहे. यामुळे विविध प्रकारचे मासे आपल्या जागा बदलत असल्याचे गेल्या काही वर्षांतील माशांच्या बदलत्या अधिवासामुळे लक्षात येत आहे. उदाहरणच द्यायचे तर साधारण 40-50 वर्षांपूर्वी पेडवा आणि बांगडा हे मासे रत्नागिरीपर्यंतच्या समुद्रातच मिळायचे. आता ते मुंबईपर्यंत मिळू लागले आहेत. तारली हा मासा दोन वर्षांपूर्वी रत्नागिरी, सिंधुदुर्गात विक्रमी प्रमाणात मिळाला. आता मात्र तो कमी प्रमाणात मिळत आहे. कोकण किनारपट्‌टीवर मच्छीमारांना त्रासदायक ठरणारा जेलिफिश अलीकडे मोठ्या प्रमाणात सापडत आहे. तुलनेत कमी महत्त्वाचा असलेला ट्रीगर फिश अलीकडे कोकणात मोठ्या प्रमाणात मिळू लागला आहे. 

मत्स्य अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार विषुववृत्तापासून समुद्राच्या तापमानात बदल होत जातो. पृथ्वीच्या दोन ध्रुवांमध्ये हे तापमान थंड असते. थंड आणि उष्ण अशा दोन्ही तापमानामध्ये मासे आढळतात; मात्र थंड पाण्यातील माशांची वाढ खूप हळू असते. वातावरणातील बदलाचा समुद्रातील करंटवर प्रभाव पडून मासे खालून म्हणजे विषुववृत्ताजवळच्या भागाकडून वरच्या भागात स्थलांतर करण्याची स्थिती निर्माण होते. भारताचा विचार केल्यास तमिळनाडूकडून मासे वरच्या म्हणजे गुजरात, बंगालकडे सरकण्याची शक्‍यता आहे. 1970 च्या दशकात माशांचे अधिवास बऱ्याच प्रमाणात स्थिर असायचे. गेल्या काही वर्षांत मात्र ते बदलताना दिसत आहेत. 

या बदलामुळे समुद्रातील माशांच्या संख्येवर फारसा परिणाम होणार नाही. मात्र, विशिष्ट भागात मिळणारे मासे तेथून गायब होऊन दुसरीकडेच जाऊ शकतात आणि तेथे वेगळेच मासे मिळू शकतात. हे मासे खाण्यासाठी किंवा मत्स्योत्पादनाच्या दृष्टीने कितपत फायदेशीर असणार, हा प्रश्‍न आहे. त्यामुळे याचा परिणाम थेट मत्स्योत्पादनावर होऊ शकतो. 

मच्छिमारांच्या अर्थकारणावर थेट परिणाम 
वातावरणातील बदलामुळे वादळ निर्माण होण्याचे प्रमाण वाढले आहे. शिवाय पावसाचे वेळापत्रकही कोलमडले आहे. याचा परिणाम मासेमारी हंगामावर होताना दिसतो. बऱ्याचदा वातावरणातील याच बदलामुळे मत्स्य हंगामातील दिवस कमी होतात. बदलत्या करंटस्‌चा परिणाम मासे न मिळण्यावर होत असल्याचेही चित्र आहे. हे सगळे बदल मच्छिमारांच्या थेट अर्थकारणावर परिणाम करत आहेत. 

हवामान बदलाचा सागरी जिवांवर होणाऱ्या परिणामाबाबत अभ्यास होण्याची गरज आहे. परदेशात असा अभ्यास केला जातो. सागरी जीवांवर होणारे परिणाम जाणून घेण्यासाठी दीर्घकाळ निरीक्षण आवश्‍यक आहे. कार्बनडाय ऑक्‍साईडचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी जागतिक स्थरावर प्रयत्न सुरू असले तरी त्याला यश येताना दिसत नाही. त्यामुळे समुद्रातील बदलांवर लक्ष ठेवणे तितकेच आवश्‍यक आहे.'' 
- डॉ. केतन चौधरी, मत्स्यजीव शास्त्रज्ञ 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

History! फुटबॉल खेळणाऱ्या देशाचे क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये पदार्पण; इटलीचा संघ T20 World Cup 2026 स्पर्धेसाठी पात्र ठरला

IND vs ENG 3rd Test: शुभमन गिलने मोडला 'विराट' विक्रम! लोकेश राहुलच्या फिफ्टीने लढवला किल्ला, रिषभ पंत दुखापतीतून सावरला

IND vs ENG 3rd Test: OUT or NOT OUT? जो रूटने अफलातून झेल, नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; राहुल द्रविडचा विक्रम मोडला, पण रंगलाय वाद

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

Shambhuraj Desai : संजय राऊतांच्या वक्तव्याची पर्यटनमंत्री शंभुराज देसाईंनी उडवली खिल्ली

SCROLL FOR NEXT