बांदा ( सिंधुदुर्ग ) - ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये वाचलेल्या भातपिकांची पंधरा ते वीस गव्यांच्या कळपाने नासधुस केल्याची घटना पाडलोस-केणीवाडा येथे आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. चार गवे घरापर्यंत पाठलाग करत आल्याचे तेथील कामगार धुंडप्पा कांबळी यांनी सांगितले. पण वेळीच कत्र्यांनी गव्यावर हल्ला केल्याने कांबळी बचावले. हातातोंडाशी आलेला घास गव्यांनी हिरावल्याने शेतकरी दुहेरी आर्थिक संकटात सापडला आहे.
पाडलोस व परिसरात गव्यांचा वावर नेहमीच असतो. दिवसाढवळ्या देखील गव्यांचे दर्शन होत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे भातपिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. निसर्गाच्या प्रकोपात वाचलेले 30 टक्के भात पीकही आज रविवारी पहाटे गव्यांनी नासधुस केल्याने शेतकरी प्रेमानंद साळगावकर यांचे मोठे नुकसान झाले आहे.
शेतीबागेत राहणारे धुंडप्पा कांबळी यांना पहाटे कुत्रे जोरजोराने भुंकण्याचा आवाज आला. त्यांनी शेतात जाऊन पाहिले असता पंधरा ते वीस गव्यांचा कळप भातशेतीचे नुकसान करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. काळोख असल्याने त्यांनी आरडाओरड केल्याने तसेच भांड्यांचा आवाज केल्याने गवे जंगलात पसार झाल्याचे श्री कांबळी यांनी सांगितले. त्यातील चार गव्यांनी कांबळी यांचा मांगरपर्यंत जीवघेणा पाठलाग केला. वारंवार भातशेती तसेच फळबागायतींचे गव्यांकडून नुकसान होत असल्याने वनविभागाने अशा उपद्रवी गव्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी प्रेमानंद साळगावकर यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.