चिपळूण : कोरोनामुळे गावी आलेले चाकरमानी पाच दिवसांच्या गणेशोत्सवानंतर पुन्हा मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. सहा महिन्यांपूर्वी गावाकडे येऊ नका, म्हणून विनंती करणारे गावकरी त्यांना आता मुंबईला नका जाऊ, अशी विनंती करू लागले आहेत. सोबत असलेली गंगाजळी संपली, आता गावात राहून खायचे तरी काय, असा प्रश्न उपस्थित झाल्याने नाईलाजास्तव त्यांना मुंबईकडे परतावे लागत आहे.
मार्च महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाचा प्रभाव मुंबईमध्ये दिसू लागला. त्यापासून वाचण्यासाठी मुंबईतील गावकरी गावाकडे निघून आले. एक - दोन महिन्यानंतर कोरोनाचा प्रभाव थांबेल आणि पुन्हा आपण आपल्या कामावर रुजू होऊ, असे अनेकांना वाटत होते. मात्र, असे झालेच नाही. कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत गेला. त्यामुळे एक - एक महिना पुढे सरकू लागला. अजून काही महिने मुंबईकडे जाता येणार नाही, याची जाणीव झाल्याने गावात आलेल्या मुंबईकरांनी गावकऱ्यांना मदत करायला सुरुवात केली.
घरांची दुरुस्ती करणे, शेतीतील बांध बांधणे, नांगरणी करणे, रिकामे बसण्यापेक्षा एकमेकांना मदत करणे सर्वांनी एकत्र येऊन धार्मिक स्थळांची डागडुजी करणे अशी अनेक कामे केली. गावातील सार्वजनिक आणि घरगुती कामात मुंबईकरांचा हातभार लागल्यामुळे गावकऱ्यांना आता त्यांची सवय झाली. पण चाकरमान्यांचा खिसा रिकामा झाल्यामुळे त्यांनी गणेशोत्सवानंतर पुन्हा मुंबई जाण्याचा पर्याय निवडला आहे. त्यामुळे गावकऱ्यांचे अंतकरण जड झाले आहे.
हेही वाचा - रत्नागिरीत आठ मंदिरांसमोर भाजपने केला घंटानाद...
"आम्ही दरवर्षी गणेशोत्सवाच्या दोन दिवस आधी गावात येतो. मात्र, यावर्षी सहा महिन्यांपूर्वीच गावात आलो होतो. येताना आणलेले पैसे संपले. त्यामुळे पुन्हा मुंबईला जातोय. गावातील लोकांनी गणेशोत्सव झाल्यानंतर जाण्याची सूचना केली."
- आशीष साळवी, अलोरे
संपादन - स्नेहल कदम
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.