कणकवली : कोरोना संसर्गामुळे गेली दोन वर्षे कोकणात येऊ न शकलेल्या चाकरमान्यांनी आत्तापासूनच गणेशोत्सवात गावी येण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे २७ ऑगस्ट ते १ सप्टेंबर पर्यंत कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सर्व गाड्यांची तिकिटे फुल्ल झाली आहेत. रेल्वेचे तिकीट न मिळालेल्या प्रवाशांना आता जादा एक्सप्रेस गाड्यांची प्रतीक्षा आहे. यंदा उच्चांकी संख्येने चाकरमानी सिंधुदुर्गात येण्याची शक्यता आहे.
यंदा ३१ ऑगस्टला गणेश चतुर्थी आहे. त्यामुळे २७ ऑगस्टपासूनच चाकरमान्यांनी कोकणात येणाऱ्या सर्व गाड्यांची तिकीटे फुल्ल झाली आहेत. यात २८ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या दरम्यानच्या गाड्यांमध्ये वातानुकुलीत टू आणि थ्री टियरच्या जागाही संपल्या आहेत. त्यामुळे कुठल्याही क्लाससाठी वेटिंग लिस्ट शिल्लक नसून तिकीट बुक करण्याचा पर्यायच शिल्लक नसल्याचे चित्र आयआरसीटीच्या संकेतस्थळावर दाखवले जात आहे.
मुंबईतून सिंधुदुर्गात येणाऱ्या प्रवाशांची ‘कोकणकन्या’, ‘मंगलोर’, ‘मांडवी’, ‘जनशताब्दी’,‘नेत्रावती’, ‘मत्स्यगंधा’ या रोज धावणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांना प्राधान्य राहिले आहे. या नियमित गाड्या जादा गाड्यांपेक्षा वेळेत पोचतात. त्यामुळे गणेशोत्सवात गावी येण्यासाठी चाकरमान्यांनी सर्वच स्थानकातील तिकीट काऊंटवर आदल्या दिवशी रात्रीपासूनच रांगा लावल्या होत्या; मात्र अवघ्या एक मिनिट कालावधीत गणेशोत्सवातील सर्व गाड्यांचे तिकीट फुल्ल होत असल्याने अनेक चाकरमान्यांचा हिरमोड झाला आहे.
प्रतीक्षा यादी संपली
गणेशोत्सव कालावधीत सर्वच रेल्वे गाड्यांमध्ये चारशे ते सहापर्यंत प्रतीक्षा यादी दाखविली जात होती; मात्र यंदा प्रतीक्षा यादी संपली असून रेल्वे गाड्यांतील स्लीपर आणि वातानुकुलीत डब्यांचे बुकिंग करताना ‘रिग्रेट’ असे दाखवले जात आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.