ओरोस : निसर्ग चक्रीवादळात बाधितांना मदत देताना शासनाने निकष बदलले आहेत. प्रत्येक घटकाला वाढीव नुकसानी देण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र नैसर्गिक आपत्तीत होणाऱ्या नुकसानीसाठी शासन मदतीचे असलेले जुने निकष बदलून वाढीव दराचे निकष लावावेत, अशी मागणी अनेक वर्षे होत होती. चक्रीवादळनिमित्ताने खास बाब म्हणून निकष बदलले आहेत; मात्र हे बदललेले वाढीव मदतीचे निकष कायम ठेवावेत, अशी मागणी कोकणवासीयांकडून होत आहे.
नैसर्गिक आपत्ती आणि कोकण यांचे एक वेगळे नाते आहे. कोकणात पाऊस सर्वाधिक पडतो. ही कोकणसाठी अभिमानाची बाब आहे; पण पाऊस अनेकवेळा उग्र रूप धारण करतो आणि होत्याचे नव्हते होते. त्यामुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील घरे, गोठे, शेती, बागायती, जमीन याची मोठ्या प्रमाणात नुकसान होते; मात्र शासनाचे नुकसान निकष अगदी जुने आहेत. शासनाने हे दर जाहीर करून कित्येक वर्षे उलटली आहेत. आता घरासाठी लागणाऱ्या साहित्याचे असलेले दर दुप्पट, तिप्पट झाले आहेत. महागाईही वाढली आहे. कृषी उत्पादनांचे दरही बदलले आहेत. त्यामुळे निकष बदलण्याची मागणी प्रत्येक आपत्तीनंतर होत होती; मात्र नियमित जुन्याच निकषांच्या आधारे मदत देऊन बोळवण केली जात होती. त्यामुळे चक्रीवादळानिमित्त वाढविलेली मदत कायमस्वरूपी करण्याची मागणी होत आहे.
निसर्ग चक्रीवादळात बाधित लोकांच्या मालमत्तेच्या नुकसानीपोटी वाढीव मदत मिळावी, अशी मागणी होत होती. त्यानुसार या निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसून बाधित झालेल्या लोकांना विशेष बाब म्हणून वाढीव मदत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. याप्रमाणे नव्या वाढीव मदतीचा शासन निर्णय जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला आहे.
अशी आहे बदललेली मदत
यापूर्वी नैसर्गिक आपत्ती येऊन नुकसान झाल्यास त्यातील पूर्णतः नष्ट झालेल्या पक्क्या व कच्च्या घरांसाठी यापूर्वी 95 हजार 100 रुपये मदत दिली जात होती. या मदतीत चक्रीवादळात नुकसान झालेल्या घरांसाठी दीड लाख रुपये एवढी जाहीर केली आहे, त्याचप्रमाणे अंशतः म्हणजे 15 टक्क्यांपर्यंत पडझड झालेल्या घरांसाठी, तसेच कच्च्या घरांसाठी, नष्ट झालेल्या झोपडीसाठी, सहा हजारांची मदत दिली जात होती. आता ही मदत 15 हजार रुपयांपर्यंत वाढविली आहे. कपड्यांच्या नुकसानीपोटी प्रति कुटुंब अडीच हजार रुपये दिले जात होते, ते पाच हजार रुपये केले आहेत. घरगुती भांडी, वस्तू नुकसानीपोटी अडीच हजार रुपये दिले जात होते. तेही प्रत्येक कुटुंबास पाच हजार रुपये दिले जाणार आहेत. दुकानदार व टपरीधारक यांच्या नुकसानीपोटी नुकसानीच्या 75 टक्के किंवा दहा हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाणार आहे. बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीपोटी दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टर 18 हजार रुपये दिले जात होते. त्यात वाढ करून दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रती हेक्टर 50 हजार एवढी मदत दिली जाणार आहे.
हे पण वाचा - दिलासा : सिंधुदुर्गात 48 तासात नवा कोरोनाबाधित नाही
बॅंक खात्यात जमा होणार रक्कम
चक्रीवादळातील बाधित लोकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यावर लाभार्थी निश्चित करून त्यांच्या बॅंक खात्यात आर्थिक मदत जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून दिली. दरम्यान, प्रचलित दरापेक्षा नुकसानीची रक्कम वाढवून दिली गेल्याने नुकसानग्रस्तांना दिलासा मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.