सावंतवाडी - मळगावात मंजूर झालेले रेल्वे टर्मिनन्स मडुर्यात नेण्यासाठी नारायण राणे यांच्या आड राहून राजन तेली हेच खरे सुत्रधार होते. त्यामुळे त्यांनी आता दिखाउपणा करु नये. त्यावेळचा विरोध स्थानिक ग्रामस्थ आजही विसरले नाहीत, अशी प्रतिटिका शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे केली.
आम्हाला केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचा आदर आहे. आम्ही त्यांच्यावर टिका केलेली नाही; मात्र कोणाच्या पुढाकाराने का होईना टर्मिनलचे थांबलेले काम मार्गी लागणे गरजेचे आहे, असेही श्री. राऊळ यांनी सांगितले. तेली यांनी काल (ता.3) येथे पत्रकार परिषद घेवून ज्या प्रभूंनी टर्मिनन्स मंजूर करुन आणले. त्यांच्यावर शिवसेनेकडून झालेली टिका दुदैवी असल्याचे म्हटले होते. याला प्रत्युत्तर देण्यासाठी श्री. राऊळ यांनी येथे पर्णकुटी विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी विलास जाधव, चंद्रकांत कासार, मेघःश्याम काजरेकर, दिलीप सोनुर्लेकर आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. राऊळ म्हणाले, “मळगाव येथे मंजूर झालेले टर्मिनन्स मडुर्यात नेण्याचा डाव त्यावेळी तत्कालीन काँग्रेसच्या नेत्यांनी आखला होता. त्यात नारायण राणे यांच्या आड राहून सुत्रधाराची भूमिका राजन तेली करीत होते. हे येथील जनतेला माहिती आहे. त्यामुळे त्यांनी आता दिखाउपणाचा आव आणू नये. जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने टर्मिनन्सचे काम पुर्ण होणे गरजेचे आहे; मात्र सद्यःस्थिती लक्षात घेता काम थांबले आहे. त्यामुळे त्याला योग्य ती गती मिळण्यासाठी आम्ही क्षेत्रीय प्रबंधकांच्या नावाने निवेदन दिले. त्यात गैर काय? आमच्या पालकमंत्री, खासदारांच्या माध्यमातून सुध्दा हे काम सुरु होण्यासाठी आमचे प्रयत्न निश्चितच आहे आणि यापुढे आमची आंदोलनाची तयारी आहे ही वस्तूस्थिती आहे. मात्र आमची ही भूमिका दुदैवी असे म्हणणारे श्री. तेली हे सत्ताधारी पक्षात असताना पाटबंधारे विभागातील अधिकार्यांकडून सुरू असलेला भ्रष्टाचार त्यांना पत्रकार परिषदेत का मांडावा लागला. त्यांनी आपल्या पक्षाचे खाते असलेल्या जलसंपदा किंवा मुख्यमंत्र्याकडे का तक्रार केली नाही? याचे उत्तर त्यांनी द्यावे.” ते पुढे म्हणाले, “प्रभू्ंबाबत आम्हाला आदर आहे आणि तो निश्चितच पाळणार आहोत. मात्र त्यांच्याच हस्ते ज्या कामाचे भूमिपुजन झाले ते काम बंद होणे म्हणजे कमीपणाचे नाही का? असा प्रश्न करुन याबाबत प्रशासनाला जाग आणण्यासाठी शिवसेनेने ही भूमिका घेतली होती. त्यात आम्हाला काही गैर वाटत नाही.”
तेलींनी त्यावेळी शेतकर्यांना धमक्या दिल्या. यावेळी दिलीप सोनुर्लेकर यांनी श्री. तेलींवर टिका केली. मळगाव टर्मिनन्सला विरोध करण्यासाठी जमिनी देणार्या शेतकर्यांना जमिनी देऊनका, असे सांगून तेली यांनी आपल्या कार्यकर्त्यांकडून धमक्या दिल्या, ही वस्तूस्थिती आहे. स्थानिक लोक अजून हा प्रकार विसरलेले नाहीत. हे तेलींनी ध्यानात ठेवावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.