मंडणगड ( रत्नागिरी ) - कोरोना, "निसर्ग' वादळ आणि अवकाळी पाऊस या संकटात एकही रुपयांची मदत केंद्र सरकारने केली नाही. उलटपक्षी भाजप नेते ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्यासाठी धडपड करीत आहेत. महाराष्ट्रात राहून पंतप्रधान फंडाला मदत करीत ठाकरे सरकारवर बिनबुडाचे आरोप करीत आहेत. कोरोना संकट जाऊ द्या, टपल्या मारणाऱ्यांना शिवसैनिक पळता भुई केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आमदार भास्कर जाधव यांनी दिला. ते मंडणगड येथे युवासेना पदाधिकारी मेळाव्यात बोलत होते.
युवासेनेत चैतन्य निर्माण करण्याच्यादृष्टीने उत्तर कोकणात मेळावे घेण्यात आले. जाधव म्हणाले, भाजपमधील नेते एकसुरात खोटं बोलत आहेत. महाराष्ट्रात ठाकरे सरकारचा द्वेष करताना छळवाद मांडला आहे; मात्र उभा महाराष्ट्र ठाकरे सरकारसोबत असून भाजपाची फडफड आणखी वाढणार आहे. दापोली मतदारसंघात आतून व बाहेरून आव्हानात्मक लढाई असूनही योगेश कदम यांना निवडून दिलेत.
याआधी या मतदारसंघात नुसती पत्रे, निवेदने सरकवण्याचे काम करणारे माजी आमदार होते; मात्र योगेश कदमांच्या रूपाने विधानसभेत बोलणारा आमदार निवडून दिलात. आमदार योगेश कदम यांनी सांगितले की, युवासेना घराघरांत पोहचली आहे. गावाचा विकास युवासेनेच्या माध्यमातून करून घ्या. सेनेतीलच विरोधक मंडळी भीतीमुळे खोटेनाटे सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील; मात्र त्याकडे लक्ष देऊ नका.
नैसर्गिक संकटात मदत करण्याची मार्गदर्शक तत्व स्थायी आदेशाप्रमाणे ठरवली आहेत; मात्र कोकणावर आलेले चक्रीवादळ संकट हे सेनेवरील संकट समजून तातडीने निर्णय करून चारपट आणि घरपट मदत देण्याचे काम ठाकरे सरकारने केले. केंद्रीय मंत्री किंवा पथक साधी पाहणी करायलाही फिरकले नाही.
- भास्कर जाधव, आमदार
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.