सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात 2018 पासून थैमान घालणाऱ्या माकडतापाच्या (केएफडी) साथीचा जोर जिल्ह्यात कमी झाला आहे. यावर्षी आतापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात माकडतापाचा एकही रुग्ण नाही, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी संदेश कांबळे यांनी दिली.
जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग या भागात 2018 पासून (केएफडी) माकडतापाचे रुग्ण आढळून येऊ लागले. या साथीने आरोग्य यंत्रणेची झोप उडवली होती. काजूच्या हंगामात गोचिडपासून पसरणाऱ्या माकडतापाने अनेकांचे बळी घेतले. सुरवातीच्या काळात अचानक उद्भवलेल्या या विचित्र तापसरीने आरोग्य यंत्रणेसह संपूर्ण जिल्ह्यातील लोकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. हा ताप कशामुळे येतो, याचे वेळीच निदान न झाल्याने अनेकांचे उपचार करण्यापूर्वीच निधन झाले. या रोगाच्या निदानासाठी जिल्ह्याबाहेरील मणिपालसारख्या यंत्रणेकडून या साथ रोगाचा अभ्यास करण्यात आला. त्यानंतर गोचिडपासून पसरणाऱ्या या साथ रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत विविध उपाययोजना करण्यात आल्या.
मृत माकडाची विल्हेवाट लावणे, गोचिड मारण्यासाठी फवारणी करणे आणि जंगल भागात व काजू बागायतीमध्ये काम करणाऱ्या लोकांना मार्गदर्शन व प्रबोधन करणे, यावर भर दिला, तरी जिल्ह्यात 2018 मध्ये माकडतापाचे 110 रुग्ण आढळले होते. त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला होता. 2019 मध्ये 80 रुग्ण आढळले. त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला. गतवर्षी 2020 मध्ये माकडतापाचे 42 रुग्ण आढळले होते. त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला होता.
जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत माकडतापाचे रुग्ण आढळणाऱ्या गावांमध्ये जनजागृती आणि उपाययोजना करून या साथीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न केले. यामुळे जिल्ह्यात 2018 पासून गेल्या तीन वर्षांत आढळणाऱ्या माकडतापाच्या रुग्णांमध्ये घट झाल्याचे दिसून आले. यावर्षी सद्यस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही माकडतापाचा रुग्ण आढळलेला नाही. सद्यस्थितीत आंबा-काजू या पिकांचा हंगाम सुरू असून, या कालावधीत माकडतापाचा फैलाव वाढण्याची शक्यता असते; मात्र माकड तापाच्या आजाराबाबत खबरदारी घेण्यात येत असल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सद्यस्थितीत एकही रुग्ण नाही, ही समाधानाची बाब आहे.
हेही वाचा-हाकेच्या अंतरावरील असलेल्या जंगलात कुत्रा लागला जोराने भुंकू अन्
सध्या जिल्ह्यात कोरोना महामारीचे संकट कायम असून, दिवसेंदिवस रुग्ण संख्येत वाढ होत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा काम करत आहे. कोरोनाचे संकट जिल्ह्यात असताना माकडतापाचे संकट मात्र सद्यस्थितीत कमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे काही प्रमाणात आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे. ही आरोग्य यंत्रणेसाठी आणि जिल्हावासीयांसाठी समाधानाची बाब आहे, संदेश कांबळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी.
संपादन- अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.