रत्नागिरी : थकबाकी असलेल्या जिल्ह्यातील ५६९ ग्राहकांना महावितरण कंपनीने मोठा झटका दिला आहे. वारंवार सांगून, आवाहन करूनही थकीत बिल न भरल्याने या सर्वांची वीज जोडणी तोडली आहे. फेब्रुवारी २०२१ या एका महिन्यात १ लाख ६३ हजार ग्राहकांनी १९ कोटी ३२ लाख एवढा वीज बिल भरणा केला आहे. मार्च २०२० मधील थकबाकीदार ग्राहकांवरही कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी वीज बिल भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
कोरोना महामारीने महावितरण कंपनीलाही अडचणीत आणले आहे. लॉकडाउनमुळे सर्व ठप्प झाले होते. अनलॉकनंतर महावितरण कंपनीने सलग तीन महिन्यांची ग्राहकांना बिले दिली; मात्र बिलांचा आकडा पाहून अनेक ग्राहक चक्रावले. वाढीव बिलाचा विषय त्यानंतर सुरू झाला, तो अजूनही गाजत आहे. विरोधी पक्षांनीदेखील याबाबत आवाज उठवला आणि बिल न भरण्याचा अनेक ग्राहकांनी निर्धार केला. वसुलीवर याचा मोठा परिणाम होऊन थकबाकी वाढतच गेली. काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री पवार यांनी महावितरणची थकीत बिले भरा, असे आवाहन केले.
दहा महिन्यांचे बिल न भरणारे तब्बल ४१ लाख ग्राहक!
राज्यातील ४१ लाख ७ हजार घरगुती ग्राहकांसह विविध वर्गवारीतील ८० लाख ३२ हजार वीजग्राहकांनी गेल्या एप्रिल २०२० पासून जानेवारी २०२१ या सलग दहा महिन्यांच्या कालावधीत एकाही महिन्याचे बिल भरलेले नाही.
महावितरण कंपनीकडून कठोर पावले
ग्राहकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने महावितरण कंपनीने कठोर पावले उचलली आहेत. मार्च २०२० ची बिले अजून न भरणाऱ्या ग्राहकांना कंपनीने झटका दिला आहे. जिल्ह्यातील अशा ५६९ वीज ग्राहकांची वीज जोडणी महावितरणने तोडली आहे. मार्च २०२० मध्ये एकूण थकबाकीदार ३८ हजार १०४ ग्राहक आहेत.
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.