महाड - नैसर्गिकदृष्ट्या धोकादायक आणि त्यातच सातत्याने होणारे अपघात, रसायनवाहू वाहनांची डोकेदुखी यामुळे खडतर झालेला मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील प्रवास आता आरामदायी व कमी वेळेचा होणार आहे. या घाटात आता बोगदा बांधण्याचे काम सुरु होत आहे. त्यामुळे वाहनचालकांना वळणावळणाच्या घाटातून गाडी नेण्याचीही कसरत करावी लागणार नाही शिवाय 40 मिनिटे प्रवासाचे अंतर केवळ 9 मिनिटांत पार होणार आहे.
मुंबई गोवा महामार्गाच्या इंदापूर ते कशेडी या दुस-या टप्प्यातील चौपदीकरणाचे काम वेगाने सुरु आहे. याच मार्गावर धोकादाटक असा कशेडी घाट आहे. रायगड व रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा हा घाट महत्वाचा व धोकादाक घाट आहे. तो पार करण्यासाठी वाहनांना चाळीस मिनिटाचा कालावधी लागतो. या घाटातून प्रवास करताना वाहनांचे मोठ्या प्रमाणात अपघात होतात. रसायनवाहू वाहने, पर्यटकांबरोबरच गणेशोत्सव व होळीत येथे मोठी वाहतूक कोंडी होत असते. तर पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या व रस्ता खचण्याचे प्रकार घडत असल्याने हा घाट प्रवासासाठी असुरक्षित झाला आहे.
या कशेडी घाटाला पर्याय देण्यासाठी डोंगरातून बोगदा काढला जात आहे. पुढील अडीच वर्षांत हे काम पूर्ण होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने या बोगद्यासाठी सर्वेक्षण पूर्ण केल्यानंतर बोगद्याचे काम रिलायन्सला देण्यात आले आहे.
या कामासाठी रुपये 502.25 कोटी खर्च येणार असुन, पावणेदोन किलोमीटरचे दोन बोगदे तयार करण्यात येणार आहेत. बोगद्यामध्ये जाण्यासाठी तीन व येण्यासाठी तीन अशा एकूण सहा लेन असतील. बोगद्याचे काम पूर्ण झाल्यावर त्या रस्त्याच्या डागडुजीची जबाबदारी चार वर्षे ठेकेदारावर राहणार आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.