कोकण

#Specialtyofvillage ‘गावकी’कडूनच चाैकुळचा कारभार

शिवप्रसाद देसाई

मंगळवार उजाडतो. दुपारी गावातील प्रत्येक कुटुंबातील एक-दोघांची पावले सातेरी मंदिराकडे वळतात. त्यात महिलाही असतात. तेथे गावकी भरते. त्यात विकासाच्या विणेचे तरंग उमटतात. त्यातील न्याय झंकार पकडले जातात आणि भविष्यातील विकासाचा नाद पुढे नेला जातो. हे गुंजन शेकडो वर्षे सुरूच नव्हे, तर समृद्धही होत आहे. हा निखळ निर्झर आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौकुळच्या गावगाड्याचा आणि माणूसकेंिद्रत दरडोई सुबत्तेचा.

राजे गेले, संस्थानिक गेले, सरकार आले; पण त्या गावचा गावगाडा लोकच चालवताहेत. पिढ्यान्‌पिढ्या जपलेली त्यांची स्वतःची व्यवस्था आहे. आणि त्यावर आजही गावकऱ्यांची गाढ श्रद्धा आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या चौकुळने जपलेली ही कबुलायतदार गावकर व्यवस्था आजही गावाला एकतेच्या घट्ट बंधात गुंफून आहे.

चौकुळ सह्याद्रीच्या रांगेत, आंबोलीशेजारी वसलेले देखणे गाव. सैनिकांचे गाव अशीही याची ओळख; पण त्याहीपेक्षा शेकडो वर्षांपासून या गावाने स्वतःची अशी व्यवस्था राखली आहे. येथील प्रत्येक निर्णय गावकरी एकत्र येऊन घेतात. यासाठी दर आठवड्याला बैठक होते. यात तंटे सोडविण्याबरोबरच शेतमजुरीचे दर, औताचे दर, चराई क्षेत्र, शेतीचे क्षेत्र, विकासकामांचे निर्णय, इतकेच काय तर कोणी कुठे घर बांधायचे याचे निर्णयही सर्व संमतीने घेतले जातात. गावकी नावाने ओळखली जाणारी ही सभा दर मंगळवारी भरते. या सर्व व्यवस्थेला कबुलायतदार गावकर म्हणून ओळखले जाते.

हे गाव मूळचे गावडे घराण्याचे. भिरवंडे (ता. कणकवली) येथून या घराण्यातील तीन भाऊ चौकुळमध्ये आले. त्यांनी गाव वसविले. शेतसारा जमा करण्यासाठी येथे खोती पद्धत रूढ झाली. गाव वसणाऱ्या तिघांच्या घराण्यातून तिघे खोत नेमले गेले. त्यांना शेतसारा जमा करण्याची इतरांनी कबुली दिली म्हणून ते कबुलायतदार गावकर झाले. यातूनच गाव चालविण्याची व्यवस्था 

ठरवली गेली. गाव चालविण्याची जबाबदारी दरवर्षी रोटेशन पद्धतीने तिघांकडे सोपवली जाते. हे तिघे गावडे घराण्याच्या मूळ तीन कुटुंबातील वंशज असतात. दरवर्षी प्रमुख बदलत असल्याने एकाधिकारशाही राहत नाही. दर मंगळवारी भरणारी गावसभा अर्थात गावकी हा या व्यवस्थेचा आत्मा. येथे साप्ताहिक सुटी दर मंगळवारी असते. या दिवशी गावच्या सातेरी मंदिरात गावकी भरते. बारा वाड्या आणि एक गावठाण मिळून बसलेल्या दहा किलोमीटर विस्ताराच्या या गावाविषयीचा प्रत्येक निर्णय येथे होतो. 

ही न्यायसभा नसते, तर इथे गावाविषयीची धोरणे ठरतात. कबुलायदार गावकर प्रमुख असले तरी निर्णय गावातील प्रमुख ग्रामस्थ, ज्येष्ठ एकमताने घेतात. एखादा तंटा झाला तर तो सोडविला जातो. यात दोन्ही पक्षांना म्हणणे मांडण्याची समान संधी मिळते. इतक्‍यावरच न थांबता शेतमजुरीचे दर, लग्नासाठीच्या विविध कामांचे दर, कोणी कुठे शेती करायची, घर कुठे बांधायचे, एखादे विकासकाम कसे करायचे, असे गावाशी संबंधित सगळे निर्णय येथे होतात. विशेष म्हणजे यात प्रत्येकाच्या म्हणण्याचा, मताचा विचार केला जातो. 

सरकारी शहाणपणा
राज्यात २००७ मध्ये तंटामुक्‍ती मोहीम जाहीर झाली. तंटे गावपातळीवरच मिटत असल्याने पहिले बक्षीस चौकुळला मिळणार, अशी खात्री होती. मूल्यमापनही झाले; पण बक्षीस मिळाले नाही. कारण गावातून पोलिस ठाण्यात एकही तक्रार नोंदवली गेली नव्हती. त्यानंतर मात्र ‘सरकारी शहाणपणा’ चौकुळवासीयांना समजला. मुद्दामहून तीन-चार तक्रारी पोलिसांकडे नोंदवून त्या गावात मिटविल्या जाऊ लागल्या.

चौकुळने शिस्त, ऐक्‍य जपले आहे. नवी पिढीही या व्यवस्थेवर विश्‍वास ठेवते; कारण येथे सर्वसमावेशक धोरणे ठरतात. अगदी गावविकासाचे अंदाजपत्रकही यात ठरते. याचा अभिमान आहे.
- गुलाबराव गावडे, 

माजी सरपंच, चौकुळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला दुसऱ्याच षटकात मोठा धक्का! इशान किशन झाला आऊट

SCROLL FOR NEXT