कोकण

#Specialtyofvillage जुवेचं जगणं पाण्याच्‍या वेढ्यात

राजेंद्र बाईत

राजापूर तालुक्‍यात चारी बाजूंनी निळ्याशार पाण्याने वेढलेले गाव म्हणजे जुवे. पारंपरिक छबिना (होडी) वगळता दळणवळणाची कोणतीही साधने नसलेल्या जुवे गावाची बेट म्हणून स्वतंत्र ओळख स्वातंत्र्यानंतर ७१ वर्षे होऊनही कायम आहे. जलदेवतेने जणू कवेत घेतलेल्या या गावाकडे पर्यटकांचा ओढा वाढत आहे.

ब्रिटिशकाळामध्ये राजापूरचे बंदर निर्यातीसाठी प्रसिद्ध होते. बंदरामध्ये ज्या खाडीतून जहाजे येत होती, त्या जैतापूरच्या खाडीमध्ये विलीन होणाऱ्या अर्जुना नदीच्या मुखाशी जुवे बेट वसले आहे. एका बाजूला जैतापूर बंदर, दुसऱ्या बाजूला देवाचेगोठणे, धाऊलवल्ली, मारवेली गाव आदी गावांचा सहवास लाभलेल्या जुवे बेटाला समुद्राच्या निळ्याशार पाण्याने वेढा घातलेला आहे. छबिन्यातून (छोटी होडी) सुमारे तीन किलोमीटरची समुद्रसफर करून गावात प्रवेश केल्यानंतर गावपणाची साक्ष मिळते.

जुवे बेटाला ऐतिहासिक पार्श्‍वभूमीही लाभली आहे. औरंगजेबाकडून संभाजीराजांना कोकणात संगमेश्‍वर येथे अटक होण्यापूर्वी पुढील परिणामांची संपूर्ण चाहूल लागलेल्या राजांनी सोबत असणाऱ्या ताराराणींना कोल्हापूरला सुखरूप पाठविण्यापूर्वी राजापूर किंवा सिंधुदुर्गात काही काळ ठेवण्याच्या सूचना मावळ्यांना केल्या होत्या. त्यावेळी ताराराणींना आरमाराने राजापूर खाडीमार्गे सिंधुदुर्गला नेण्यात येणार होते. ही जबाबदारी आरमारी मालोजी खोत शिंदे-कांबळी यांच्यावर होती.

राजापूर खाडीच्या मुखावर व अरबी समुद्रालगत असलेल्या यशवंत गडावरील पोर्तुगीजांमुळे ताराराणींना बाहेर नेणे शक्‍य नव्हते. त्यामुळे काही दिवस ताराराणींना जुवे बेटावर ठेवण्यात आले. ही जबाबदारी पार पाडणाऱ्या मालोजी खोत शिंदे-कांबळींना हे बेट इनाम देण्यात आले. कुणाचीही वस्ती नसलेल्या जुवे गावचे कांबळी पहिले वंशज मानले जातात. किरकोळ शेती, सागरसंपत्तीवर अवलंबून असलेल्या जुवेवासीयांना काळानुरूप उदरनिर्वाहाचा प्रश्‍न भेडसावू लागला. त्यातून जुवेवासीयांनी मुंबईची वाट धरली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर आजही जुवेवासीय तिकडे जातात. खाडीतील मुळे, खेकडे, कालवे या व्यतिरिक्त उत्पन्नाचे साधन नाही.

ग्रामपंचायत आणि फळबाग लागवड योजनेच्या माध्यमातून आंबा आणि काजूची अडीच हजारांहून अधिक झाडांची लागवड झाली. गावात १९८४ मध्ये वीज आली. जुवेचा जमिनीशी संपर्क होऊन खारलॅण्ड बंधाऱ्याला मूर्त स्वरूप मिळाले; पण बंधाऱ्याची दरवर्षी होणारी झीज आणि दुरुस्तीकडे झालेले दुर्लक्ष आदींमुळे बंधारा ढासळला आहे. जुवेवासीयांचे छबिना हेच संपर्काचे एकमेव साधन. गावामध्ये एकही दवाखाना वा वैद्यकीय सुविधा नाही वा दुकान नाही. 

जुवेवासीयांची कुलदैवते 
पारंपरिक पद्धतीची उताराची कौलारू घरे अधिक आहेत. अलीकडे चिरेबंदी आणि स्लॅबच्या घरांची उभारणी झाली आहे. घरासमोर अंगणात रांगोळी रेखाटलेली असते. आंबा, फणस, नारळ, काजू यांबरोबरच वड, काजरा, धामन, किंजळ, पिंपळ आदी झाडांमुळे आल्हाददायक वातावरण आहे. मालवण रेवंडी येथील श्री भद्रकाली देवी आणि अणसुरेचा श्रीदेव गिरेश्‍वर ही जुवेवासीयांची कुलदैवते. गावामध्ये श्री रवळनाथाच्या दोन प्रमुख मंदिरांबरोबरच राईतील श्री सीमराई देवीची मंदिरे आहेत. स्वतंत्र ग्रामपंचायत आणि दोन-चार मुलांची पटसंख्या असलेल्या शाळेची इमारत सुसज्ज आहे.

समुद्रकिनाऱ्यामुळे जुवे गावाला काही समस्यांना सामोरे जावे लागत आहे. असे असले तरी त्या समुद्रकिनाऱ्यामुळे तसेच निसर्गसौंदर्यामुळे गावाला पर्यटन साज चढला आहे. ग्रामस्थांसह सहकारी सदस्यांच्या साथीने गावचा विकास करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याला साऱ्यांची साथ हवी.
- सौ. सारिका सचिन कांबळी,
सरपंच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: लाईक्ससाठी पेटवलं जंगल ! सोशल मीडियावर आगीचा व्हिडिओ अपलोड केल्या प्रकरणी तिघांना बेड्या

Manisha Koirala : उमरावजान साकारणार होती मल्लिकाजान ? मनीषाने सांगितली 18 वर्षांपूर्वीची गोष्ट

Harshit Rana KKR vs LSG : कारवाईनंतरही हर्षित राणा सुधरला नाही; बीसीसीआयला पुन्हा डिवचलं?

Latest Marathi News Update : १० जूनला भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेईल- पंतप्रधान नरेंद्र मोदी

World Athletics Relays : भारतीय महिला अन् पुरुष संघाची रिलेमध्ये दमदार कामगिरी, आता ऑलिम्पिक पदकासाठी पॅरिसमध्ये धावणार

SCROLL FOR NEXT