चिपळूण : चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असताना मंगळवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास प्रथम तिवरे-खडपोली धरण भरून वाहू लागले. त्यानंतर धरणाला भगदाड पडत असल्याचे लक्षात आल्याने स्थानिक तलाठ्यांनी गावकऱ्यांना खबरदारीचा इशारा दिला. त्यानंतर तासाभरातच धरण फुटून धरणाखाली येणाऱ्या गावांमध्ये पाणी घुसले आणि हाहाकार उडाला.
चिपळूण तालुक्यातील तिवरे-खडपोली धरण फुटले असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील किमान सात गावे पाण्याखाली गेली आहेत. या घटनेने परिसरात हाहाकार माजला असून किमान 23 ग्रामस्थ वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मंगळवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे यासह सात गावांमध्ये पाणी घुसले आहे. यात किमान 23 ग्रामस्थ वाहून गेल्याची भीती आहे, अशी माहिती रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली. स्थानिकांशी संपर्क साधला असता त्यांनी किमान 23 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली आहे. पाण्याचा प्रचंड वेग असल्याने काही घरेही वाहून गेल्याची भीती आहे. ज्या गावांमध्ये धरणाचे पाणी शिरले आहे त्या गावांत सुमारे 3 हजार इतकी लोकवस्ती आहे. आतापर्यंत तीन मृतदेह हाती लागले आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.