चिपळूण : तिवरे धरण दुर्घटनेतील जे ग्रामस्थ बेघर झाले आहेत, त्यांना घर देण्यासंदर्भातील कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी या कामाचा सविस्तर आढावा घेत अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. हा प्रोजेक्ट संपूर्ण भारतात एक आदर्श प्रोजेक्ट म्हणून ओळखला जाईल, असे काम मला अपेक्षित असल्याचे सांगितले.
तिवरे पुनर्वसन कामासाठी सुमारे 11 कोटी 49 लाखाचा निधी आवश्यक आहे. त्यापैकी पाच कोटी रुपये सिद्धीविनायक न्यास, प्रभादेवी मुंबई यांनी दिला आहे. उर्वरित निधी देण्याची जबाबदारी आपण स्वीकारली आहे. या संदर्भातील सर्व कार्यवाही तातडीने पूर्ण करून लवकरच सर्व कामांच्या निविदा काढाव्यात, अशा सूचना सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
बैठकीत जमीन अधिग्रहण करण्यापासून इतर सर्वच मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. अलोरे व तिवरे येथे दोन ठिकाणी बाधित कुटुंबांचे पुनर्वसन करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात घरांच्या बांधकामासाठी निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत.
मात्र धरण उभारणीसाठी आवश्यक त्या हालचाली तातडीने सुरू झालेल्या नाहीत. बैठकीला सर्व स्थानिक सक्षम अधिकाऱ्यांसामवेत जिल्हाधिकारी मिश्रा, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, अतिरिक्त पोलिस अधीक्षक गायकवाड, श्री. बेलदार, श्री. माने, आरोग्य व बांधकाम सभापती महेश म्हाप आदी उपस्थित होते.
संपादन : प्रफुल्ल सुतार
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.