22L67539
परशुराम घाटातील वाहतूक आठवडाभर बंद
बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण ; चिरणी मार्ग पावसाळ्यापूर्वी सुसज्ज
चिपळूण, ता. १३ ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पऱशुराम घाटाच्या चौपदरीकरणासाठी घाटातील वाहतूक किमान आठवडाभर पूर्णपणे बंद ठेवावी लागेल. या घाटास पर्यायी मार्ग असलेला चिरणी मार्ग पावसाळ्यापूर्वी सुसज्ज करण्यात येईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी आढावा बैठकीत दिली. ज्या जिल्ह्यांमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया प्रलंबित आहे ती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश जिल्ह्याधिकाऱ्यांना देण्यात येतील, अशी माहितीही त्यानी दिली.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासंदर्भात सोमवारी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात कोकणातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची बैठक पार पाडली. या बैठकीला शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार जयंत पाटील, भरत गोगावले, राजन साळवी, वैभव नाईक, शेखर निकम, प्रशांत ठाकूर आदी तसेच राष्ट्रीय महामार्गाचे वरिष्ठ अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव व अन्य अधिकारी उपस्थित होते.
मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल ते कासू व कासू ते इंदापूर या ८४ किमीच्या रस्त्याच्या रखडलेल्या काँक्रिटीकरणाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश यांनी आज दिले. महामार्गाच्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे हेच या सरकारचे उद्दिष्ट आहे. महामार्गाचे काम १० पॅकेजेसमध्ये सध्या सुरू आहे. त्यापैकी ५ पॅकेजेसचे काम पूर्ण झाले असून उर्वरित पॅकेजेसचे काम प्रगतीपथावर आहे तसेच मुंबई-गोवा महामार्ग चौपदीकरणाचे काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गत रायगड जिल्ह्यातील कासू ते पनवेल या सुमारे ४२ कि.मीच्या महामार्गावरील एका लेनचे काम मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येईल तसेच याच महामार्गावरील दुसऱ्या लेनच्या रस्त्यावरील खड्डे लवकरच भरण्यात येतील. या रस्त्याचे पॅचवर्क तसेच आवश्यक काँक्रिटीकरणाचे काम लवकर करण्याचे निर्देशही मंत्री चव्हाण यांनी दिले.
चौकट
युद्ध पातळीवर काम करणार
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गत जी काही रखडलेली कामे शिल्लक आहेत ते लवकर पूर्ण करण्याच्यादृष्टीने युद्धपातळीवर काम करण्यात येतील. नॅशनल हायवे ऑथॉरिटी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये योग्य समन्वय राखण्याच्या सूचना या वेळी मंत्री चव्हाण यांनी दिल्या. चौपदरीकरणामध्ये ज्या ठिकाणी ब्लॅकस्पॉट्स आहेत ते काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येईल तसेच रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे शिल्लक काम हे नियमित कंत्राटदारांकडून करण्यात येईल; पण अन्य छोटी-छोटी कामे ही अन्य ठेकेदारांकडून पूर्ण करून घेण्यात येतील.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.