चिपळूण - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रत्नागिरी दौऱ्यासाठी चिपळूण आगारातील ५० एसटी आरक्षित करण्यात आल्यामुळे चिपळूण आगारातील शंभरहून अधिक लोकल फेऱ्या रद्द झाल्या आहेत. चिपळूण तालुक्यातून अडीच हजार लोकांना एसटीने रत्नागिरीत नेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दौरा मुख्यमंत्र्यांचा आणि त्रास सामान्यांना अशी स्थिती आज दिसत होती.
मुख्यमंत्री शिंदे यांनी नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ तातडीने मिळावा यासाठी शासन आपल्या दारी ही नवीन योजना सुरू केली आहे. यामुळे लाभार्थ्याला शासकीय कार्यालयात चकरा माराव्या लागू नयेत असा त्यामागे हेतू आहे. शासनाच्या ७५हून अधिक योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आज रत्नागिरीच्या दौऱ्यावर आले; मात्र यापूर्वी दाखले मिळवण्यासाठी सामान्य नागरिकांना घर ते शासकीय कार्यालय असा प्रवास करावा लागत होता.
मुख्यमंत्र्यांच्या रत्नागिरी दौऱ्यामुळे तब्बल अडीच हजार लोकांना रत्नागिरीपर्यंत प्रवास करावा लागला. या लोकांना रत्नागिरीपर्यंत नेण्यासाठी चिपळूण आगारातील ५० एसटी आरक्षित करण्यात आल्या. सावर्डे येथे नागरिकांना नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे चिपळूण आगारातील अडीच हजार किमीच्या फेऱ्या रद्द झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
लांब पल्ल्याहून आलेल्या प्रवाशांना ग्रामीण भागात घराकडे जाण्यासाठी आगारातच एसटीची वाट बघत बसावे लागते. चिपळूण आगारातून, गुहागर, खेड, पोफळी मार्गावर सुटणाऱ्या अनेक फेऱ्या आज अचानक रद्द करण्यात आल्या.
त्यामुळे प्रवासी साहित्य घेऊन दीर्घकाळ आगारात एसटीची वाट बघत उभे राहिले होते.
अनेकजण आरक्षण खिडकीमध्ये जाऊन एसटी कधी सुटेल, याची चौकशी करत होते, तेव्हा एसटी उपलब्ध झाली तर सोडू, असे एसटी कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांना सांगितले जात होते. अपुऱ्या गाड्यांमुळे एसटीचे वेळापत्रकही कोलमडल्याने सर्व गाड्या उशिराने धावत होत्या. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी बसेस पुरवताना इत्तर फेऱ्या रद्द होऊन स्थानिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली जाणार असल्याचे आगारप्रमुखांकडून सांगण्यात आले होते; पण वास्तविक चित्र काही वेगळेच दिसत होते.
शासन आपल्या दारी येणार असेल तर मुख्यमंत्र्यांनी लोकांना रत्नागिरीपर्यंत का बोलावले? हे सर्वसामान्य लोकांचे मुख्यमंत्री असतील तर त्यांच्या दौऱ्याचा सामान्य लोकांना त्रास का? सध्या कडक उन्हाचे दिवस आहेत. सुट्टीच्या हंगामात लांब पल्ल्याहून रात्रीचा प्रवास करून सकाळी लवकर घरी पोहोचणे हे आमचे उद्दिष्ट. मुख्यमंत्र्यांना खरच सामान्य लोकांची आस्था असेल तर त्यांनी असे शो करण्यापेक्षा कडक प्रशासन राबवले पाहिजे.
- संतोष होलकर, मिरजोळी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.