कोकण गारठला!
दापोलीत निचांकी; चिपळुणातही पारा घसरला
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. २९ : कोकणात शहरासह ग्रामीण भागात दिवसागणिक थंडीचा कडाका वाढू लागला आहे. दापोली तालुक्यात गारठा अधिकच वाढला असून, यावर्षी तापमान आणखीन खाली आले आहे. यावर्षीच्या निचांकी तापमानाची नोंद (९ अंश) दापोलीत झाली आहे; तर रत्नागिरीत पारा १८ अंशांवर आणि चिपळुणातही किमान तापमान पहिल्यांदाच १५.५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यांतही पारा घसरला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे संपूर्ण राज्यातही त्याचे परिणाम दिसून येत आहेत. ऑक्टोबर हीटमुळे उष्ण तापमानात वाढ झाली होती तसेच गेल्या महिन्यात पावसामुळे थंडीच्या हंगामालादेखील तशी उशिराच सुरवात झाली आहे. २१ नोव्हेंबरपासूनच तापमानात घसरण होऊ लागली आहे. २१ ला कमाल तापमान १०.९, २७ ला १०.५, २८ ला ९.९, तर आज २९ ला ९ अंश सेल्सिअस कमाल तापमान आहे. त्यामुळे संपूर्ण दापोली तालुका गारठला आहे. सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत हवेत भरपूर प्रमाणात गारठा असतो. सायंकाळी साधारण ५ वाजल्यानंतर गारठा सुरू होतो. तापमानातील घट आणि बोचरे वारे यामुळे प्रत्यक्ष तापमानापेक्षा एक ते दोन अंश तापमान कमी जाणवत असल्याने चिपळूणही गारठले आहे. सायंकाळनंतर, तर दिवसाही शहरात हुडहुडी भरवणाऱ्या थंडीची अनुभूती येत आहे.
दरम्यान, जिल्हाभरात दिवसभर थंडीची तीव्रता वाढली आहे. थंडीचा जोर अजून वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून तापमानात घट होत आहे. गुलाबी व बोचऱ्या थंडीमुळे शहरासह आता ग्रामीण भागातीलसुद्धा राहणीमान बदलू लागले आहे. उबदार कपड्यांची मागणी वाढली असून हिवाळ्यात व्यायाम करणे चांगले असल्याने पहाटेपासून सूर्योदयापर्यंत बीचवर, मोठ्या मैदानांवर व्यायाम व फिरणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. तसेच गेल्या महिन्यात अवकाळी पावसामुळे थंडीच्या हंगामालादेखील तशी उशिराच सुरुवात झाली आहे.
तापमानातील घसरण (अंश सेल्सियसमध्ये)
२१ नोव्हेंबर - १०.९
२७ नोव्हेंबर - १०.५
२८ नोव्हेंबर- ९.९
२९ नोव्हेंबर- ९.
__
कोट
सध्याचे वातावरण आंब्याचे चांगले आणि लवकरात लवकर पीक येण्यास पोषक आहे; परंतु यापेक्षा जर जास्तच पारा घसरला आणि थंडी वाढली तर मात्र ते आंबा पिकाला धोक्याचे ठरू शकते. सध्याच्या वातावरणामुळे काही झाडांना मोहोर आला आहे. काहींना येण्याची परिस्थिती आहे. वातावरण जर स्थिर राहिले तरच आंबा यंदा मार्केटमध्ये लवकर येऊ शकतो.
- स्वप्नील गुरव, आंबा बागायतदार, मुर्डी.
कोट
आज पारा एकदम १ अंशाने खाली आला. या दिवसांमध्ये आकाशात जर ढग असतील तर वातावरणात उबदारपणा राहतो आणि आकाशात जर बिलकूल ढग नसतील तर वातावरणात थंडीचे प्रमाण वाढते. तसेच हिमालयात अजूनही बर्फवृष्टी होत असल्याने आपल्याकडे वातावरणात बदल होत आहेत.
- डॉ. विजय मोरे, हवामान केंद्र अधिकारी, कोकण कृषी विद्यापीठ, गिम्हवणे.
००००
सिंधुदुर्गातही निचांकी नोंद
वैभववाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातही थंडीचे प्रमाण वाढले असून, आज पहाटे मुळदे संशोधन केंद्रावर ११ अंश सेल्सियस इतक्या या वर्षांतील नीचांकी तपमानाची नोंद झाली. हवामान विभागाने ३ आणि ४ डिसेंबरला पावसाचा अंदाज दिल्यामुळे आंबा, काजू बागायतदारांची धास्ती वाढली आहे.
बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीमुळे उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह राज्यात येत आहेत. त्याचा प्रभाव कोकणातही जाणवण्यास सुरुवात झाली असून, थंडीची लाट आली आहे. गुरुवारी (ता. २८) रात्रीपासून थंडीमध्ये प्रचंड वाढ झाली. थंड वारे वाहत असल्यामुळे नागरिकांना प्रथमच कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे.
पावसाच्या अंदाजाने धास्ती
दुसरीकडे नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरीत ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने ३ आणि ४ डिसेंबरला सिंधुदुर्गात हलक्या पावसाचा अंदाज दिला आहे. पावसाच्या शक्यतेने आंबा, काजू बागायतदारांची धास्ती वाढली आहे. आंबा, काजू पिकाला सध्या चांगली पालवी आणि मोहोर येऊ लागला आहे. ढगाळ वातावरण आणि पाऊस झाल्यास या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.