rat18p9.jpg
51944
संगमेश्वरः मुंबई- गोवा महामार्गाच्या दुहेरी लाईनचे काम सुरू आहे.
--------------
रखडलेल्या महामार्गाचा उद्योग, पर्यटनाला फटका
यंदा गणेशोत्सवातील चाकरमान्यांचा प्रवास खडतरच; उड्डाणपुलाची कामे अर्धवट
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १८ : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग मागील चौदा वर्षांपासून रखडला आहे. त्याचा फटका कोकणातील पर्यटन आणि उद्योगक्षेत्राला बसला आहे. महामार्गावरून मुंबईतून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना बारा ते पंधरा तासांचा विलंब सहन करावा लागत आहे. आता राज्याने जानेवारी २०२६ अशी महामार्ग पूर्णत्वाची नवीन तारीख दिली आहे; मात्र कामाची गती पाहता चौपदरीकरण पूर्णत्वासाठी आणखी दोन वर्षे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवातही चाकरमान्यांचा महामार्गावरील प्रवास खडतरच राहण्याची शक्यता आहे.
सलग सुट्टीच्या हंगामात कोकण बहरलेले असते. गोव्याकडे जाणारे पर्यटकही रत्नागिरी, सिंधुदुर्गात थांबतात. त्यामुळे सुट्टीच्या हंगामात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते; मात्र सध्या रस्ते खराब असल्यामुळे गोव्याकडे जाणारे पर्यटक रेल्वे आणि हवाई वाहतुकीला प्राधान्य देतात. त्यामुळे सुट्टीच्या हंगामातील उलाढाल कमी झाली आहे. राज्य सरकारने रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योग उभारणीसाठी ९३६.२५ कोटींचे ५२ उद्योग आणि सिंधुदुर्गात ३१३.५६ कोटींचे ४३ उद्योग प्रस्तावित केले आहेत. या उद्योगातून रत्नागिरीत १ हजार १२५ आणि सिंधुदुर्गात ८७२ थेट रोजगार उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे महामार्गाचे काम लवकर पूर्ण झाल्यास उद्योगक्षेत्रालाही गती मिळेल, तसेच पर्यटन व्यवसायालाही चालना मिळेल.
मुंबई ते गोवा महामार्ग मे २०२५ पर्यंत पूर्ण होईल, अशी ग्वाही सरकारकडून दिली होती; परंतु चौपदरीकरण कामाची गती धिमी राहिल्याने यंदा शिमगोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. जुन्या मुंबई-गोवा महामार्गावरील दुपदरी रस्ता तसेच माणगाव आणि इंदापूर शहरांमध्ये प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. यामध्ये चाकरमान्यांना चार ते पाच तास नाहक अडकून पडावे लागत आहे.
चौकट
हातखंबा, पाली, लांजातील काम संथगतीने
कशेडी ते लांजा या टप्प्यातील खेड रेल्वेस्थानक पुलाचे काम अपूर्ण आहे. परशुराम घाटातील कामही अद्याप शिल्लक आहे. चिपळूण शहरातील पुलाचे काम सुरू असल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. लांजा शहरातील उड्डाणपुलाचे काम अपूर्ण आहे. पाली शहरातही उड्डाणपुलाचे केवळ खांब उभारले आहेत तर हातखांबा येथील उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरू आहे तसेच संगमेश्वर येथील उड्डाणपुलाचेही काम धीम्या गतीने सुरू आहे.
कोट
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण आता लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. सरकार किंवा ठेकेदार एजन्सीला जिथे सहकार्याची गरज आहे तिथे आम्ही सर्व लोकप्रतिनिधी सहकार्य करण्यास तयार आहोत. जनतेची आता सहनशीलता संपलेली आहे. ठेकेदार एजन्सीने आतातरी दिलेली वेळ पाळावी.
- भास्कर जाधव, आमदार, गुहागर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.