73012
आणीबाणीत लढलेल्यांसाठी पूर्ण सहकार्य
जिल्हाधिकाऱ्यांची ग्वाही; लाभ न मिळालेल्यांचे प्रस्ताव तयार करू
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २५ ः आणीबाणी काळात तुरुंगवास भोगलेल्यांना तसेच त्यांच्या कुटुंबाला आवश्यक सहकार्य केले जाईल. ज्यांना याचा लाभ मिळाला नाही. मात्र, त्याचे पुरावे आहेत, असे प्रस्ताव सादर केले जातील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी आज दिली.
जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सभागृहात आणीबाणीला ५० वर्षे झाल्याच्या निमित्ताने तुरुंगवास भोगलेल्या व्यक्ती व कुटुंबीय यांचा सत्कार तसेच चित्र व माहिती प्रदर्शनाचे आयोजन जिल्हा प्रशासन व जिल्हा माहिती अधिकाऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने आज केले होते. यावेळी अध्यक्ष स्थानावरून जिल्हाधिकारी पाटील बोलत होते. व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, निवडणूक उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे, भूसंपादन उपजिल्हाधिकारी आरती देसाई, शारदा पोवार, लवू म्हाडेश्र्वर, आणीबाणी शिक्षा भोगलेल्यांचे नेते गजानन पणशीकर आदी उपस्थित होते.
यावेळी चित्र व माहिती प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी पाटील यांच्या हस्ते झाले. हा चित्र व माहिती प्रदर्शनाचा कार्यक्रम महिनाभर चालणार आहे. प्रत्येकी तालुक्यात याचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी सन्मानपत्र देऊन आणीबाणी शिक्षा भोगलेल्या व्यक्ती व त्यांच्या कुटुंबीयांचा जिल्हाधिकारी पाटील यांनी सत्कार केला. पणशीकर म्हणाले, ‘आणीबाणी काळात आम्ही तुरुंगवास भोगला. तुरुंग अधिकाऱ्यांचे अत्याचार सहन केले. आम्ही तुरुंगात असलो तरी बाहेर असलेल्या व्यक्ती दडपणाखाली वावरत होत्या. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. ते पुन्हा उभे राहू शकले नाहीत. आम्हाला मिळणारे जेवण निकृष्ट होते. एकूण १३० कुटुंबे होती. त्यातील १०६ व्यक्ती हयात आहेत.’ जिल्हाध्यक्ष सावंत यांनी आणीबाणीत नेतृत्व करणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींच्या सानिध्यात काम करायला मिळत आहे, याबाबत समाधान व्यक्त केले. नीलेश पवार यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांनी आभार मानले.
....................
मानधनासाठी प्रस्ताव द्या
प्रास्ताविक करताना निवासी उपजिल्हाधिकारी सुकटे यांनी, आणीबाणीमध्ये शिक्षा भोगलेल्या ४४ जणांना मानधन सुरू आहे. यातील एक महिन्यापेक्षा जास्त शिक्षा भोगलेले २९ जण हयात असून, मानधन घेत आहेत, तर ११ जणांच्या विधवा पत्नी मानधन घेत आहेत. एक महिन्यापेक्षा कमी शिक्षा भोगलेल्या चौघांना मानधन मिळत आहे. अजून कोणाकडे पुरावे असल्यास मानधन मिळण्यासाठी प्रस्ताव सादर केले जातील. आज उपस्थित नसलेल्या व्यक्तींची सन्मानपत्रे घरी पोहोच केली जातील, असे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.