सरपंचपादासाठी तिरंगी लढतीचे संकेत
गणेशगुळे ग्रामपंचायत ; आरक्षणाबाबत उत्सुकता
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ९ ः रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे सरपंच श्रावणी रांगणकर यांनी पदाचा राजीनामा दिल्यामुळे लवकरच पुन्हा निवडणूक लागणार आहे. पाचपैकी तीन वर्षे पूर्ण होत आली असून, दोन वर्षासाठी थेट सरपंच निवडला जाणार आहे. या पदासाठी तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गणेशगुळे ग्रामपंचायत सरपंचपदासाठी अडीच वर्षांपूर्वी झालेल्या थेट निवडणुकीत ठाकरे शिवसेना, शिंदे शिवसेना आणि भाजप अशी तिरंगी लढत झाली होती. सात ग्रामपंचायत सदस्य आणि थेट सरपंचपदासाठी ही निवडणूक झाली होती. सरपंचपद ओबीसी महिला राखीव होते. या वेळी तिन्ही पक्षांनी स्वतंत्र पॅनल उभे करून निवडणूक लढवली होती. त्यापूर्वी झालेल्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली होती व बहुमत मिळवले होते; परंतु अडीच वर्षापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाने सहा जागा जिंकल्या तर एक जागा भाजपने जिंकली. सरपंच निवडीकरिता शिंदे गटाच्या श्रावणी विक्रांत रांगणकर या निवडून आल्या. त्यामुळे ग्रामपंचायतील शिंदे शिवसेनेचे वर्चस्व निर्माण झाले होते. एकहाती सत्ता आल्यामुळे गावची विकासकामे योग्य तऱ्हेने सर्वांच्या सहमतीने होतील, अशी अपेक्षा होती. ग्रामस्थांनी बहुमत देत एकहाती शिवसेनेला सत्ता दिली. त्यानुसार कारभार चालवला जाईल, अशी अपेक्षा होती; परंतु थोडा कालावधी गेल्यानंतर महिला सरपंच आणि सदस्य यांच्यात एकमत होत नव्हते. सदस्यांनी आपल्याला विश्वासात न घेता कारभार चालवला जात असल्याचा आरोपही केला होता. त्यामुळे विकासकामे करताना अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे अखेर ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंचांविरोधात अविश्वास ठराव दाखल केला. सदस्यांचे बहुमत नसल्याने अविश्वास ठरावाला सामोरे जाण्याऐवजी सरपंचांनी पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे उर्वरित दोन वर्षाकरिता थेट निवडणूक निश्चित आहे. हे पद ओबीसी महिलांसाठी आरक्षित होते. आता उर्वरित दोन वर्षांसाठी ही निवडणूक होणार आहे. नव्याने झालेल्या आरक्षण सोडतीत सरपंचपद सर्वसाधारण गटासाठी खुले झाले आहे. त्यामुळे ही निवडणूक जुन्या आरक्षणानुसार की, नव्या याबाबत सर्वांना उत्सुकता आहे; मात्र निवडणूक झालीच तर लढत तिरंगी होणार, हे निश्चित आहे. दोन्ही शिवसेना निवडणुकीसाठी सज्ज झाल्या असून, या परिसरात भाजपचेही प्राबल्य असल्याने ते निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे.
---
कोट
गणेशगुळेमध्ये मंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे झाल्यामुळेच लोकांनी आमच्या पॅनेलला बहुमताने निवडून दिले होते. त्यामुळे आजही त्या गावांमध्ये विकासकामे मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे सरपंचपद पुन्हा आमच्याच पक्षाचा उमेदवार घेणार, हे निश्चित आहे.
- बंधू वारिसे, उपविभागप्रमुख, शिंदे शिवसेना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.