ग्राऊंड रिपोर्ट - लोगो
rat16p27.jpg
91900
राजापूरः ग्रामीण रुग्णालयाच्या येथे रस्त्यामध्ये बसलेले जनावर.
rat16p28.jpg-
N91901
राजापूरः जवाहरचौकामध्ये असलेली गुरे.
राजापुरात मोकाट गुरांचा उपद्रव
अपघातासह वाहतूककोंडी ; दंडात्मक कारवाईची गरज
राजेंद्र बाईतः सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १६ : राजापूर शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात रस्त्यासह रहदारीच्या ठिकाणी दिवसा-रात्री मोकाट गुरे ठाण मांडून बसतात. त्यामुळे अनेकवेळा अपघात होत आहेत. त्यात मुक्या जनावरांचा मृत्यू होतो आणि वाहतूककोंडीलाही सामोरे जावे लागते. मोकाट गुरांची ही समस्या गंभीर होत आहे. याला गुरांच्या मालकांचा हलगर्जीपणा आणि गोधन संरक्षण जबाबदारी जाणिवेचा अभाव हीच प्रमुख कारणे आहेत. त्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी दंडात्मक कारवाईबरोबरच गोमालक शेतकऱ्यांमध्ये जाणीवजागृतीची गरज आहे.
राजापूर शहरातील तीव्र उताराच्या मुख्य रस्त्यासह गर्दीचे ठिकाण असलेल्या जवाहरचौकात मोकाट गुरे ठाण मांडून बसलेली असतात तसेच राजापूर-धारतळे-पावस-रत्नागिरी या मार्गावरही कशेळी, रातांबशेंडा, धारतळे, कोतापूरफाटा, सोलगाव, तेरवणफाटा, बारसू या परिसरात तर, मुंबई-गोवा महामार्गावर कोदवली, उन्हाळे, हातिवले रस्त्यावर जनावरांचा वावर असतो. रात्री काळोखामध्ये बसलेली ही गुरे वाहनचालकांना जवळ येईपर्यंत दिसत नाहीत. काहीवेळा भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांची धडक बसून जनावरांना अपघात होतो. त्यात मुकी जनावरे जखमी होतात किंवा त्यांना प्राणही गमवावा लागतो. वाहनचालकांकडून जोरजोरात हॉर्न वाजवला तरीही, जनावरे रस्त्यावरच ठाण मांडून राहतात. त्यामुळे अनेकवेळा वाहतूककोंडी होते.
पालिकेच्या कोंडवाड्याची दूरवस्था
मोकाट गुरांविरोधात कारवाई केली तर पकडलेल्या जनावरांना सुरक्षित ठेवण्यासाठी पालिकेने शहरात कोंडवाडा उभारला आहे. त्याचे छप्पर मोडकळीस आलेले असून, छप्पराचे पत्रे सडलेले आहेत. रस्त्याच्या बाजूने त्याला झाडाझुडपांनी वेढलेले आहे. या कोंडवाड्याची पार दूरवस्था झाली आहे. मोकाट गुरे पकडल्यानंतर त्यांना कोंडवाड्यात ठेवल्यास त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. एका बाजूला मोकाट गुरे पकडण्याची मागणी केली जात असताना, पकडलेल्या गुरांना ठेवण्यासाठीच्या कोंडवाड्याची अवस्था वाईट आहे. याकडे फारसे कुणीही लक्ष देत नाही.
कारवाईला मालकांकडून केराची टोपली
राजापूर शहरात फिरणार्या मोकाट जनावरांना चाप लावण्यासाठी पालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली होती. त्यात गेल्या दोन वर्षामध्ये चौदा हजारांचा दंड केला. यावर्षी तीन हजार रुपयांचा दंड केला आहे. पालिकेच्या दंडात्मक कारवाईनंतरही मोकाट जनावरांचा वावर कमी झालेला नाही. त्यामुळे पालिकेच्या कारवाईची जनावरांच्या मालकांना भीती राहिलेली नाही.
बेफिकीरपणा वाढतोय
रस्त्याने भरधाव धावणार्या वाहनांची धडक होऊन झालेल्या अपघातात जनावरांचा मृत्यू झाल्यास त्या अपघाताला वाहनचालकाला जबाबदार धरले जाते. काहीवेळा जनावरांचे मालक नुकसानभरपाईही घेतात; मात्र, मुळातच मालकांनीच आपली जनावरे मोकाट सोडली नाहीत, योग्य ती खरबरदारी घेऊन घरीच बांधून ठेवल्यास त्यांचा रस्त्यावरील वावर कमी होईल तसेच अपघातांनाही आळा बसेल. ही बाब जनावरांच्या मालकांनी लक्षात घेतली पाहिजे.
गुरांच्या गळ्यात रेडियम नाईट ग्लो पट्टे
रस्त्यामध्ये बसलेल्या वा रस्ता ओलांडणार्या मोकाट गुरांना धडक देऊन अपघात टाळता यावा यासाठी राजापूरमध्ये बजरंग दलातर्फे मोकाट गुरांच्या गळ्यामध्ये रेडियम नाईट ग्लो पट्टे बांधलेले आहेत. रात्री रस्त्याने धावणार्या वाहनांचा प्रकाश पडून हे रेडियम नाईट ग्लो पट्टे चमकतात. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यास मदत होते. या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ग्रामपंचायतींना निर्देश
मोकाट गुरांसह ती सोडणाऱ्या गुरांच्या मालकांवर कारवाई करण्याची मागणी बांधकाम विभाग, पंचायत समिती, पोलिस विभाग, नगरपालिका प्रशासन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्याची तत्काळ दखल घेत पंचायत समिती प्रशासनाने ग्रामपंचायतींना गुरांच्या मालकांवर कारवाई करण्यासाठी सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचवेळी पशुसंवर्धन विभागालाही इअरटॅगिंग करण्याची सूचना केली आहे. पोलिसांसह संबंधित प्रशासनाला अशाप्रकारे मोकाट गुरे सोडणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती देण्याचे धाडस ग्रामपंचायती दाखवतील का? हे महत्वाचे आहे.
चौकट
कुठे असतात मोकाट जनावरे
* जवाहरचौक परिसर
* नगर वाचनालय, जिल्हा परिषद बांधकाम परिसरातील रस्ता
* राजापूर हायस्कूलच्या येथील तीव्र उतार आणि वळण
* तहसीलदार कार्यालयासमोरील रस्ता परिसर
* जकातनाका रस्ता परिसर
* मुन्शीनाका परिसर
* मुंबई-गोवा महामार्गावर एसटी डेपोच्या पुढील भागातील उड्डाणपूल
* साईनगर परिसर
* आठवडा बाजार परिसर
* राजापूर-धारतळे-रत्नागिरी या मार्गावर
* जैतापूर सागरी महामार्ग
कोट
“ मोकाट फिरणाऱ्या गुरांचा प्रश्न हा केवळ वाहतुकीचा अडथळा नाही तर गंभीर सामाजिक व मानवी समस्या आहे. यामुळे अनेक अपघात घडतात, जीवितहानी होते, काहींना अपंगत्व येते, निरपराध, मुक्या जनावरांनाही गंभीर दुखापती होतात. खरा शेतकरी आपल्या गुरांना मुलाप्रमाणे जपतो, तो त्यांना मोकाटपणे रस्त्यावर सोडत नाही; परंतु जे गुरांचा केवळ उपयोग करून घेतात आणि त्यानंतर त्यांची जबाबदारी टाळून त्यांना रस्त्यावर सोडतात, तेच या समस्येला कारणीभूत आहेत. अशांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.
- राजन लाड, सामाजिक कार्यकर्ते
“ मालकांनी वा शेतकऱ्यांनी मोकाट गुरे सोडू नयेत. गुरांना गोठ्यामध्ये चारा दिल्यास त्याचा गाई-म्हशींकडून दूध देण्याचे प्रमाण वाढण्यास फायदा होऊ शकतो. या संबंधित पशुसंवर्धन विभागातर्फे संवाद साधून गावोगावच्या शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे. एखाद्या गुराला लम्पीसारख्या आजाराचा संसर्ग झालेला असल्यास आणि त्याला मोकाट सोडल्यास त्याच्यातून या आजाराचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येण्यासारखी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. जनावरांची इअर टॅगिंगही करून घ्यावी.”
- डॉ. वैभव चोपडे, पशुधन विकास अधिकारी, राजापूर पंचायत समिती